मुंबई : महान्यूज लाईव्ह
दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाणे डोकाडिया कुटुंबासाठी जीवघेणे ठरले असून, कुटुंबातील चारही सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुघल बिल्डिंग आणि पायधुनी परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाने शनिवारी रात्री एकत्र बिर्याणीचे जेवण केले होते. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्ले. मात्र, हे फळ खाल्ल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. काही वेळातच चौघेही शुद्ध हरपून घरात पडले.
अब्दुल्ला डोकाडिया (वय ४०), नसरीन डोकाडिया (वय ३५), आयशा डोकाडिया (वय १६), झैनब डोकाडिया (वय १३) या चौघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तातडीने त्याच इमारतीत राहणाऱ्या डॉ. कुरेशी यांना पाचारण केले. डॉ. कुरेशी जेव्हा घरात शिरले, तेव्हाचे दृश्य पाहून तेही हादरले. त्यांनी माहिती दिली की, मी जेव्हा पोहोचलो तेव्हा चौघेही बेशुद्ध होते. लहान मुलीची नाडी लागत नव्हती.
मी तातडीने सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि रुग्णालयात हलवले. त्यांच्या शरीरात एखादा अत्यंत विषारी घटक वेगाने भिनल्याचे जाणवत होते. त्यांच्या रक्तात ॲसिडिक प्रक्रिया (Acidosis) सुरू झाली होती, ज्यामुळे प्रकृती वेगाने खालावली. दुर्दैवाने, जे.जे. रुग्णालय आणि साबू सिद्दिकी रुग्णालयात उपचार सुरू असताना या चौघांचीही प्राणज्योत मालवली.
ही घटना अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे (Food Poisoning) घडली की कलिंगडामध्ये काही घातक रसायने होती, याचा तपास पोलीस करत आहेत. कलिंगड खाल्ल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल.











