संसदेत स्वतःला महिलांचे तारणहार म्हणून मिरवता, पण उन्नावपासून मणिपूरपर्यंत जेव्हा महिलांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले, तेव्हा तुमची ही ‘मसीहा’गिरी कुठे गेली होती? अशा शब्दांत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींसह भाजप सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली भाजपने सत्तेसाठी रचलेला ‘राजकीय कट’ जनतेने ओळखून तो उधळून लावला आहे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
प्रसिद्धीचा फुगा फुटला, आता ‘पीआर’ चालणार नाही!
प्रियांका गांधी यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेचे वाभाडे काढताना विचारले की, दिल्लीच्या रस्त्यांवर जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला खेळाडू न्यायासाठी रडत होत्या, तेव्हा या ‘मसीहा’ सरकारने त्यांची विचारपूस का केली नाही? “केवळ भाषणात महिलांचे कैवारी म्हणवून घेऊन चालत नाही, तर तसे वागावे लागते. जनतेचा आता तुमच्यावरील विश्वास उडाला असून केवळ मीडियाबाजीच्या जोरावर राज्य करता येणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले.
आरक्षणाच्या नावाने सत्तेचे ‘षडयंत्र’
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रियांका गांधी यांनी गंभीर आरोप केला की, “अचानक बोलावलेले हे अधिवेशन आणि गुप्त ठेवलेला मसुदा म्हणजे महिलांचे कल्याण नसून सत्तेत टिकून राहण्याचे एक षडयंत्र होते. महिलांच्या नावावर आरक्षण आणून मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून स्वतःची खुर्ची कायमस्वरूपी सुरक्षित करण्याचा सरकारचा हा कट होता. हे विधेयक महिलांसाठी नाहीच, तर ते केवळ राजकीय पुनर्रचनेचा खेळ होता.”
उत्तर आणि दक्षिण भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न?
देशाच्या अखंडतेवर भाष्य करताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी जागांच्या संख्येवर मर्यादा (फ्रीज) घातली होती, जेणेकरून उत्तर आणि दक्षिण भारतात फूट पडू नये. मात्र, सध्याचे सरकार पुनर्रचनेच्या नावाखाली दक्षिण भारतातील आणि छोट्या राज्यांचे राजकीय वजन कमी करण्याचा धोकादायक प्रयत्न करत आहे, ज्याला काँग्रेस कधीही संमती देणार नाही.
“होय, भाजपसाठी हा ‘काळा दिवस’च!”
विरोधकांच्या एकजुटीने भाजपला बसलेला हा मोठा धक्का असल्याचे सांगत प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजपने हा ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले ते योग्यच आहे. कारण, विरोधी पक्षांना महिलाविरोधी ठरवून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा त्यांचा डाव सपशेल फसला आहे. हा महिलांचा सन्मान नसून सत्तेसाठी रचलेली चक्रव्यूह रचना होती, जी आता उद्ध्वस्त झाली आहे.











