बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू असतानाच आज आमदार रोहित पवार यांनी सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या समवेत तब्बल एक तास चर्चा केली.
या चर्चेनंतर आमदार रोहित पवार यांनी ही चर्चा सकारात्मक झाले असून काँग्रेसची एक वैचारिक परंपरा आहे आणि त्यानुसार काँग्रेसचे नेते यामध्ये सकारात्मक निर्णय घेतील अशी आपली अपेक्षा आहे असे ते म्हणाले. मी या अर्ज माघारी साठी सकारात्मक असल्याचे रोहित पवार म्हणाले.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात तब्बल 53 जण आणि 68 अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी सहा उमेदवारांनी आतापर्यंत माघार घेतलेली आहे. आज माघारीच्या शेवटच्या दिवशी किती उमेदवार अर्ज माघारी घेतात, त्यावर या निवडणुकीच्या बिनविरोध निवडीची प्रक्रिया ठरणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना देखील आग्रही आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत त्यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याबाबत विनंती केली, तसेच पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी दिलगिरी व्यक्त करत काँग्रेसने या विषयावर पूर्णविराम द्यावा अशी देखील विनंती केली.
या संदर्भात आमदार रोहित पवार म्हणाले, बारामती विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणं ही अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील प्रत्येकाची आणि तमाम बारामतीकरांची इच्छा आहे. अजितदादांची बहुतांश राजकीय कारकिर्द ही काँग्रेसमध्ये आणि नंतर काँग्रेससोबत गेली. या काळात काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध राहिला.
आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची मुंबईत भेट घेतली आणि अजितदादा, त्यांचं काम आणि त्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध बघता काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती त्यांना केली.
अजितदादांसारख्या एका प्रमुख नेत्याच्या अपघाताचा FIR जर महाराष्ट्रात होत नसेल अशा सरकारविरोधात संघर्ष का करु नये? असा स्पष्ट विचार त्यांनी यावेळी मांडला. त्यांच्या या विचारांचा आणि त्यांच्या पक्षाच्या धोरणाचा आदर आहे. पण तरीही काँग्रेससह अर्ज दाखल केलेल्या इतरही सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेऊन सुनेत्राकाकी यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करावं, अशी माझी या सर्वांना विनंती आहे आणि या विनंतीचा हे सर्वजण आदर ठेवतील, असा विश्वास आहे असे रोहित पवार म्हणाले.











