विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
राज्यातील बहुजन समाजातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी ‘महाज्योती’मार्फत दिले जाणारे प्रशिक्षण पुन्हा ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (महाज्योती) या संस्थेमार्फत बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), रेल्वे आदी स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र, अलीकडे हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले असून, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये राहून अभ्यास करणे आवश्यक असते. या ठिकाणी मिळणारे स्पर्धात्मक वातावरण, अनुभवी मार्गदर्शकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि नियमित अभ्यासाची शिस्त यामुळे ऑफलाइन प्रशिक्षण अधिक प्रभावी ठरते. ऑनलाइन पद्धतीत या गोष्टींचा अभाव जाणवत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान,२८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी ‘महाज्योती’मार्फत घेण्यात आलेल्या सीईटी चाळणी परीक्षेत सुमारे ९० टक्के विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची बाब समोर आली आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन प्रशिक्षणावरील नाराजीचे स्पष्ट संकेत असल्याचे सोलनकर यांनी नमूद केले.
या मागणीसाठी देण्यात आलेल्या निवेदनावेळी स्वप्नील मोडक, अमर बुदगुडे, ओंकार कड्डे, रसिका सणस, आबासाहेब थोरात, अनिकेत भालेराव, सुयोग सावंत, परमेश्वर तागुंदे, जगदीश कोळेकर, विवेक साळुंखे, संदीप केसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या मागणीवर सरकार काय निर्णय घेणार, तसेच ‘महाज्योती’चे प्रशिक्षण पुन्हा ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











