
अमूलला दूध भेसळ चालत नाही असे हर्षवर्धन पाटील नेमकं का म्हणाले असतील?
सुरेश मिसाळ, महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापुरात बंद पडलेल्या दूधगंगा संघाला पुनर्जिवित करताना गुजराती अमूल इंदापुरात आणून हर्षवर्धन पाटलांनी अर्थकारणाबरोबर राजकारणातही अनेक दगड एकाचवेळी मारले आहेत, राष्ट्रवादीशी संबंधित दूध प्रकल्पाकडून होत असलेली कथित शेतकऱ्यांची पिळवणूक दूर करण्यासाठी अमूलची मदत तर होईलच, परंतु यानिमित्ताने होत असलेल्या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचा चेहराही उघडा पाडता येईल हे गणित हर्षवर्धन पाटलांनी यामागे मांडले असावे, त्यामुळेच अमूलच्या संदर्भातील पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांनी अमूलला दुधात भेसळ चालत नाही असा शब्द वापरला.
दूधगंगा संघ यापुढे अमूल साठी दूध संकलन करणार आहे. यानिमित्ताने इंदापूर तालुक्यात दूध दराची नक्की स्पर्धा होईल अशी चिन्हे आहेत. खरे तर इंदापुरात महाराष्ट्रातील सर्वाधिक दूध संकलन करणारा सोनाई दूध संघ तसेच त्याच्याशी स्पर्धा करणारा नेचर डिलाईट हा प्रकल्प सुरू आहे, याखेरीज मंगलसिद्धी आणि अन्य छोटे प्रकल्पही येथे कार्यरत आहेत, मात्र हे बहुतेक सर्व दुध प्रकल्प राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंधित अथवा राष्ट्रवादीचे समर्थक असलेल्या उद्योजकांचे आहेत, परिणामी आपापले दूध संकलन सांभाळून लुटूपुटूच्या दराची लढाई खेळली जाते अशी भावना दूध उत्पादकांमध्ये आहे. विशेषत: सोनाई दूध प्रकल्प हा राज्याच्या दूध दराच्या संबंधित निर्णयांवर परिणाम करत असतो, त्याची राज्यातील दूध दरांमध्ये महत्त्वाची भूमिका असते. अशा स्थितीमध्ये गेली काही वर्षे बंद पडलेला व तो बंद पडला म्हणून हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय स्थिती वरती आरोप-प्रत्यारोपांचे काहूर माजवणारा दूधगंगा संघाला पुनरुज्जीवित करण्याने हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाची नवी इनिंग या निमित्ताने सुरू होईल अशी दिसते.
जर अमूल हा दुधाच्या स्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्यातील सर्व दूध संघांच्या पुढे गेल्यास त्याचा फटका निश्चित खाजगी दूध प्रकल्पाना तर होईलच, परंतु यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या शेतकरीकेंद्रित राजकारणावरही नेमकेपणाने बोट ठेवण्यात भाजप यशस्वी होईल असे दिसते. भारतीय जनता पार्टीला शेतकरीकेंद्रित राजकारण करताना शेतकरी हिताचे निर्णय मागील पाच वर्षात घेता आले नव्हते, परिणामी शेतकऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी चीड होती, त्याचा फटकाही भाजपला विधानसभेच्या निवडणुकीत बसला आता राज्यांमध्ये पुन्हा भाजपला स्थिरस्थावर व्हायचे आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण करणाऱ्या शेतकरी हितावर राजकारण करणाऱ्या व पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असलेल्या नेत्यांचा भारतीय जनता पार्टी उपयोग करेल अशी चिन्हे आहेत, अशा स्थितीमध्ये हुशार व चतुर राजकारणी अशी ओळख असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी अमूल शी संधान साधणे, हा निव्वळ योगायोग नाही तर भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय राजकारणातून दिले गेलेले एक वेगळेच संकेत आहेत असे दिसते.
हर्षवर्धन पाटील यांच्या म्हणण्यानुसार इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास सहा लिटर दूध संकलन केले जाते, मात्र खासगी दूध संस्थांकडून दूध उत्पादकांना योग्य मोबदला मिळत नाही. हर्षवर्धन पाटील यांचे हे म्हणणे बरोबर आहे, कारण 25 रुपये प्रति लिटर दुधाचा दर इंदापूर तालुक्यातील अत्यल्प दूध उत्पादकांना मिळाला, त्याचबरोबर दुधाचे अनुदान सरकारकडून मिळत नाही या कारणावरून तालुक्यातील दूध उत्पादकांना हा 25 रूपयांचा दर मिळाला नाही. त्यामुळेच दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आहे, मात्र कोणताही पर्याय नसल्याने दूध उत्पादक एक तर सोनाई किंवा नेचर डिलाईट हा पर्याय निवडत होते, आता मात्र शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय उभा राहिलेला आहे आणि अमूलने देखील पाच वर्षांसाठी हा करार केला असल्याने आता खऱ्या अर्थाने तालुक्यातच नव्हे तर राज्याच्या पश्चिम भागामध्ये चांगल्या प्रकारची दुधाच्या दराची स्पर्धा होईल अशी चिन्हे आहेत.
हर्षवर्धन पाटील काय म्हणाले ?
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दुधगंगा सहकारी संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती देताना 8 जून पासून इंदापूर तालुक्यात दूधगंगा संघाने अमूलसाठी दूध संकलन सुरू केले असून अमूल दुध संस्थेबरोबर करार केल्याने शेतकऱ्यांना दुधामध्ये प्रतिलिटर चार ते पाच रुपयांनी जास्त अधिकचा दर मिळणार असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी दुधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, कार्यकारी संचालक एम.डी. कुलकर्णी, विलास वाघमोडे उपस्थित होते.
अमूल दूध संघ हा राज्यातील नामांकीत संघ आहे. चांगल्या दर्जाचे दूध म्हणून त्याची ख्याती आहे.दुधात भेसळ चालत नाही. सध्या दूधगंगा संघ दूध संकलन करीत आहे, यामध्ये शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सेवा चांगली मिळणार आहे. इंदापूर तालुका कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. अमुलचे पशुखाद्य हे उच्चप्रतीचे व चांगल्या दर्जाचे आहे. यामुळे जनावरांच्या दुधात चांगली वाढ होत असल्याने जास्तीत जास्त शेतकर्यांचा जनावरांना अमुलचेच पशु खाद्य देण्याकडे कल असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. सध्या संस्थेकडे २५ बल्क कुलर आहेत त्यापैकी १४ ठिकाणी बल्क कुलर सुरू केले असून उर्वरित ठिकाणी देखील लवकरच बल्क कुलर सुरू करण्यात येणार आहेत अशी माहितीही पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, सध्या खासगी दूध संस्थांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र सामान्य दूध उत्पादकाला ज्यादा उत्पन्न मिळावे, असा प्रामाणिक हेतु दुधगंगाचा आहे. तसेच दररोज दोन वेळेस दूध संकलन सुरू राहणार असून दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रत्येक दहा दिवस आला त्याचा पगार मिळणार आहे. सध्या दररोज तीन हजार लिटर दुधाचे संकलन सुरू केले आहे. येथील प्रकल्पाची एक लाख लिटर दूध हाताळण्याची क्षमता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यामार्फत अधिकचा दर मिळणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.
अर्थात सहकारावर नियंत्रण ठेवावे लागेल
अर्थात असे असले तरी दूधगंगा संघ आजही सहकारी तत्त्वावरील आहे आणि सहकारातील स्वाहाकाराचे राजकारण हेच मुळी खाजगी संस्थांच्या पथ्यावर पडले. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरोखरच न्याय द्यायचा असेल आणि अमूल कडून येणारा दर हा स्पर्धात्मक वाजवी व शेतकऱ्यांच्या हिताचा असा देणार असेल तर यापूर्वीची दूधगंगा संघातील चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी देखील हर्षवर्धन पाटील यांना घ्यावे लागेल, तसे झाले नाही तर मात्र एक चांगली संधी हर्षवर्धन पाटील यांच्याकडून निसटेल. हर्षवर्धन पाटील हे राजकीय परिस्थितीवर स्वार होण्यासाठी चतुर आणि हुशार राजकारणी म्हणून ओळखले जातात, त्यामुळे आता या परिस्थितीत ते यावरही लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.










