केंद्रीय मंत्री व सासरे रावसाहेब दानवेंविरोधात व्हिडीओ क्लिप करून आत्महत्येची धमकी..
पुणे : महान्यूज लाईव्ह
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरोधात गंभीर आरोप करणारा व्हिडीओ केला असून आपला मृत्यू झाल्यास रावसाहेब दानवे यांना जबाबदार धरावे असे म्हटले आहे. या व्हिडीओने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे.
हर्षवर्धन जाधव या व्हिडीओत काय म्हणालेत पहा
हर्षवर्धन जाधव मागील आठवड्यातच माझी उत्तराधिकारी संजना या असतील असे सांगत राजकारणातून सन्यांस घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लागलीच काही दिवसांतच जाधव यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोप करीत महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेची राळ उधळून दिली. दानवे कुटुंब आपल्या मरणावर उठल्याचे अप्रत्यक्ष सांगत रावसाहेब दानवे हे खोटे गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोप केला आहे. दानवे यांच्या मुलीशी लग्न केल्यानंतर पहिले अपत्य झाल्यानंतर पत्नी संजना यांच्याशी वैवाहिक संबंध उरले नसल्याचा दावा केला आहे. २००४ मध्येच मी शिवसेनेकडून आमदार झालो असतो, मात्र शिवसेनेची ऑफर माझ्यापर्यंत पोचवली नाही व प्रचंड त्रास दिला. मला आमदारकीच्या वेळी देखील १२ हजार चौरस फूटाचा बंगला विकावा लागला, मात्र लोकांमध्ये दानवे यांनी निवडणूकीला पैसे पुरवल्याचे पेरले, माझी जमीन विकली,. तुम्हीच कमी दराने घेतली असा आरोपही जाधव यांनी केला आहे. मी गरीब होत गेलो आणि तुम्ही मात्र हेलिकॉप्टरमधून कसे फिरू लागला. माझा मतदारसंघ बागायती व तुमचा दुष्काळी कसा? माझ्य़ा आईबाबतही तुम्ही भिकारी आहेत असा आरोप केला, मात्र माझी आई काटकसरी व आम्ही मध्यमवर्गीय आहोत. म्हणूनच पावशेराने दुध ती खरेदी करायची, आता दानवेसाहेब, तुम्ही जगा व मला जगू द्या, नाहीतर मी आत्महत्या करीन, तुम्हीही अडचणीत याल. असा इशारा जाधव यांनी या २० मिनीटांच्या व्हिडिओमध्ये दिला आहे. मी आता कोचिनला निघालोय, सोबत सायनाईडच्या गोळ्या घेतल्या आहेत, खोटे गुन्हे लादण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर मी जीव देईन, परंतू तुमचे सारे व्हिडीओ बाहेर काढेन अशी धमकी व इशाराही जाधव यांनी दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मोहिते पाटील, मुंडे, तटकरे आदी राजकीय कुटुंबांनंतर दानवे- जाधव यांच्यातील अंतर्गत कौटुंबिक कलह यानिमित्ताने खूपच उजेडात आल्याने राजकीय घराण्यांमध्ये सारे काही आलबेल नसते यावर शिक्कामोर्तब झाले आहे.










