सखे आणि सोबती : आनंदराव भोसले (वाणेवाडी, ता. बारामती )
आनंदरावांसाठी त्यांचे आणि पवारसाहेबांचे नाते हे कार्यकर्ता आणि नेता असे नव्हते, तर देव आणि भक्ताचे होते. आनंदरावांनी फुलविलेल्या फळबागेतील फळांची पहिली पेटी साहेबांसाठी जात असे. त्यांच्या ग्रीन हाऊसमधील फुलांची पहिली भेट साहेबांना दिल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. पवारसाहेबांवर एका व्यक्तीने हल्ला केला, अशी बातमी आली त्यावेळी आनंदराव आजारी होते. त्यावेळी दिवसभर सगळ्यांनी आग्रह करूनही अन्नाचा एकही घास त्यांच्या घशाखाली उतरला नाही. कोणत्याही कामात असले तरी मनात विचार चाले तो साहेबांचा.
देशभरातील साहेबांच्या सभेसाठी कसेही करून जात. डेहराडूनला राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन होते. त्यावेळी घरात लग्न निघाले होते; पण त्यातूनही वेळ काढून आनंदराव डेहराडूनला गेलेच. साहेबांनी जळगाव ते नागपूर पायी दिंडी काढली, तेथे गेले. नागपूरला साहेबांना अटक करून दुसर्या ठिकाणी ठेवले होते. नागपूरसारख्या अनोळखी शहरात पत्ता हुडकत हुडकत जेथे साहेब होते, तेथे गेले आणि त्यांच्याबरोबर राहिले. यामध्ये निर्भेळ प्रेमाखेरीज काही नव्हते. ना कधी कोणत्या पदासाठी आग्रह धरला, ना कधी व्यक्तिगत काम सांगितले. फक्त प्रेम दिले आणि प्रेम घेतले.
आनंदराव आजारी असताना त्यांचा मुलगा दिवाळीनिमित्त साहेबांना भेटायला गेला होता. बोलता बोलता साहेबांनी आनंदरावांची चौकशी केली. ते आजारी आहेत, हे कळल्यावर पुढच्या दोन तासांत साहेब वाणेवाडीत घरी हजर झाले. साहेबांना पाहून बिछान्यावर पडलेल्या आनंदरावदादांच्या चेहर्यावर तरतरी आली. साहेबांशी झालेल्या गप्पांनंतर त्या आधारावरच त्यांनी आपल्या आयुष्यातील अखेरचे चारपाच महिने काढले.
वाणेवाडीतील भोसले हे मातब्बर घर. कोणत्याही प्रसंगाला थेट सामोरे जाण्याची त्यांची क्षमता पंचक्रोशीत सगळेजण जाणून होते. सोमेश्वर साखर कारखान्याच्या संघर्षात या घराने सतत शरद पवारांना साथ दिली. त्यांनी कारखान्यासाठी जे नेतृत्व दिले ते विनातक्रार मान्य केले.
कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे कोणत्याही क्षणी संघर्ष होण्याचे ठिकाण. येथेही भोसल्यांच्या घरातील माणसे सर्व तयारीनिशी शरद पवारांच्या विचारामागे उभी असत. आनंदरावांना आपले हे सामर्थ्य चांगलेच माहिती होते. त्यामुळे स्वभाव आक्रमक नसला तरी भीती हा शब्द त्यांना माहीत नव्हता. कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे उमेदवार आणि तत्कालीन कारखान्याचे चेअरमन समोर उभे असताना त्यांच्यासमोर जाऊन पवार गटाचे पोस्टर, बॅनर लावण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. मात्र हे सगळे करायचे, ते शरद पवारांसाठी.
रेल्वेचा संप
मुंबईत जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वेचा संप घडवून आणला. त्यावेळी पवारसाहेबांचा आनंदरावांना फोन आला, हा संप मोडून काढायचा आहे, त्यासाठी आपल्या गावाकडची मुलं घेऊन मुंबईला या. आनंदरावांनी आसपासची मुले गोळा केली. मजुरी काम करणारी, गरिबांची मुले घेतली. एक मुलगा तर बागेत काम करत होता. त्याच्या डोक्यावरची पाटी खाली टाकून आहे त्या कपड्यांवर त्याला ट्रकमध्ये टाकला. असे ५० हून जास्त तरुण घेऊन मुंबईला गेले. मुंबईत शिरणेही त्यावेळी अवघड होते, त्यावेळी अनेक खटपटी करून या सगळ्यांना माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये पोहोचवले. तेथे त्यांना कामाला लावले. राहण्याची आणि जेवणाची काहीच व्यवस्था नव्हती. या स्थितीत आठवडाभर तेथे राहिले. या मुलांना बाहेरून वडापाव किंवा जे मिळेल ते आणून त्यांची जेवणाची व्यवस्था केली. काही दिवसांनी वातावरण निवळले. त्यानंतरही या मुलांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करून आनंदराव पुन्हा वाणेवाडीला आले. ही सगळी मुले आज रेल्वेत कायम सेवेत चांगल्या पगारावर काम करत आहेत.
कोईमतूरची रोपे
आनंदरावांना आधुनिक शेतीची मोठी आवड. प्रत्यक्ष शेतात काम केले नाही तरी नवनवीन प्रयोग करून पाहणे ही आवडीची गोष्ट. या आवडीतून परिसरात पहिल्यांदाच इंडम कंपनीचे हायब्रीड टोमॅटो केले. दापोलीहून चिकूची रोपे आणली, नागपूरहून संत्र्याची रोपे आणली. ग्रीन हाऊसमध्ये फुलशेती केली. या फुलशेतीच्या प्रयोगावेळी कोईमतूरच्या एका संस्थेची मदत घेतली होती. त्याच सुमारास पवारसाहेब या संस्थेत पाहणीसाठी गेले होते. तेथे चर्चा करताना आनंदरावांनी येथून रोपे नेली आहेत, ही माहिती साहेबांना कळली. नियोजित भेटीनंतर त्यांनी संस्थेच्या मॅनेजरला बोलावून घेतले. पुन्हा सखोल चौकशी केली. आमच्या माणसाने येथून रोपे नेली आहेत. तो प्रकल्प खरेच फायदेशीर आहे का, त्यांना नक्की फायदा होईल का, याबद्दल खोदून खोदून प्रश्न विचारले. पूर्ण समाधान झाल्यावरच साहेब तेथून गेले. राजकारण्यांबद्दल मनात अढी असलेला पाटील नावाचा हा मॅनेजर यानंतर पवारसाहेबांचा कट्टर भक्त झाला.
एकदा साहेबांची भेट झाली त्यावेळी आनंदराव, त्यांचे बंधू आणि मुलगा बरोबर होता. कर्जमाफी करावी की नाही याबाबत त्या वेळेस चर्चा सुरू होती. साहेबांनी ग्रीन हाऊसचे काम पाहत असणार्या आनंदरावांच्या मुलाला फुलशेतीबाबत माहिती विचारली. आनंदरावांना साखर कारखान्याबाबतची माहिती विचारली तर दूध संघावर काम करणार्या त्यांच्या बंधूंना दूध धंद्याबाबत माहिती विचारली. हे तिन्ही व्यवसाय तोट्यात चालू आहेत, हे लक्षात आल्यानंतर कर्जमाफीबद्दल मत विचारले. समोरच्या माणसांकडून माहिती काढून घेण्याचे साहेबांचे हे कौशल्य होते.
वैष्णोदेवी ते बारामती
आणखी एक प्रसंग साहेबांच्या नियोजनकौशल्य आणि सर्वव्यापी संपर्काची ओळख करून देणारा. आनंदराव त्यांच्या काही मित्रांना घेऊन वैष्णोदेवीला गेले. वैष्णोदेवी येथेच त्यांच्या एका सहकार्याला मृत्यू आला. तेथील स्थानिकांनी सांगितले की येथून मृतदेह परत नेणे अशक्य आहे. येथेच सर्व संस्कार करा. आनंदराव म्हणाले, ङ्गङ्घया माणसाला मी घेऊन आलो आहे. त्याचा मृतदेह त्याच्या घरापर्यंत पोहोचविणे ही माझी जबाबदारी आहे. त्यांनी त्यांच्या देवाला साकडे घातले. पवारसाहेबांना फोन केला आणि सर्व व्यवस्था झाली. मृतदेह एका पेटीत घालून जम्मू स्टेशनपर्यंत नेण्यात आला. तेथे ५० हून जास्त कार्यकर्ते त्यांना शोधत आले. त्यांनी आणलेले हार त्या पेटीवर घालून श्रद्धांजली वाहिली. मृतदेह रेल्वेने नेण्यास परवानगी नसते. येथे विशेष परवानगी काढण्यात आली. मृतदेह रेल्वेच्या डब्यात ठेवला. गाडी सुटेपर्यंत हे कार्यकर्ते थांबून होते. यानंतरही ज्या स्टेशनवर गाडी थांबेल, त्या स्टेशनवर बर्फ घेऊन हमाल तयार असे. मृतदेह ठेवलेल्या पेटीत बर्फ टाकण्याचे काम तो करत असे. काही कार्यकर्ते येत, मृतदेह घेऊन जात असलेल्या लोकांसाठी जेवण देऊन जात असत. जम्मूपासून दौंडपर्यंत केवळ पवारसाहेबांच्या शब्दावर ही सोय झाली.
आनंदरावांकडे समन्वय साधण्याची हातोटी होती. त्यामुळे अनेक परस्परविरोधी लोकांशी त्यांचा चांगला संपर्क असे. तालुक्यात आलेल्या प्रत्येक सरकारी अधिकार्याशी त्यांची मैत्री होई. या मैत्रीच्या बळावर त्यांनी अनेक विकासकामे गावासाठी करून घेतली. अनेक अडचणीच्या प्रसंगांचे पुढारीपण या समन्वयाच्या बळावर त्यांच्याकडे येत असे. सोमेश्वर देवस्थानाचा जीर्णोद्धार हा लोकांच्या भावनेचा विषय होता. येथील प्रत्येक वास्तूशी लोकभावना निगडित होत्या. त्यामुळे काही नवी रचना करणे जिकिरीचे होते. यातून अजितदादा पवार आणि देवस्थान कमिटी यांच्यात समन्वय घडविण्यात आनंदरावांचा मोठा सहभाग राहिला. त्यातून आज सोमेश्वर देवस्थानचे नवे रूप दिसते आहे.
आनंदरावांनी पंचायत समितीवर काम केले. महाराष्ट्र राज्य पुष्पविकास संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. सोमेश्वर साखर कारखान्यावर संचालकपदी काम केले. त्यांची जी क्षमता होती त्यानुसार त्यांना सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमनपद मिळायला हवे होते, अशी त्यांच्या समर्थकांची भावना होती; परंतु आनंदरावांनी याबाबत कधीही नाराजी दाखवली नाही. त्यांच्यासाठी त्यांचा देव सगळ्यांत मोठा होता. त्याच्या प्रेमछायेत राहणे हेच त्यांचे जीवनध्येय होते. ते त्यांनी सार्या आयुष्यभर जपले.
संकलन : घनश्याम केळकर, बारामती मो. 9881098138










