मुंबई – महान्यूज लाईव्ह
आज बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सची बैठक आयोजित केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्ग होणार असला, तरी पालकांनी घाबरू नये व अनावश्यक औषधे मुलांना देऊ नयेत असे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे जूनपासून कंपन्यांचे लस उत्पादन वाढेल, तेव्हा महाराष्ट्रात २४ तास लसीकरण करण्यात येईल असे सूचक विधान केले आहे.
महाराष्ट्रात सध्या बहुतेक लसीकरण केंद्रे बंदच आहेत. अगदी दोन ते तीन दिवसांतून एकदा लस उपलब्ध होते, तेही अल्प प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध होत असल्याने लसीकरण केंद्रांवर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होत आहे अशा स्थितीत ठाकरे यांनी जून पासून लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढेल असे भाकित केले असून त्यानंतर लसींचा साठा उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केला आहे.
ठाकरे यांनी डॉक्टरांशी बोलताना महाराष्ट्रात १२ कोटी डोस एकरकमी खरेदी करण्याची तयारी सरकारची आहे, मात्र डोस उपलब्ध नाहीत अशी माहिती दिली. तर प्रत्येकाचे लसीकरण होईल, लसीपासून कोणीही वंचित राहणार नाही असे स्पष्ट केले आहे.