सखे आणि सोबती: जगन्नाथआण्णा कोकरे, पणदरे, ता. बारामती
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी एक पिढी होती. स्वातंत्र्य मिळण्याची खात्री नव्हती. स्वत:सह सारे घरदार प्रचंड अडचणीत सापडण्याची मात्र खात्री होती. या पिढीचे काही प्रतिनिधी त्यादिवशी पणदरे गावच्या चावडीवर उभे होते. हातापायात साखळदंड बांधलेले, पोलिसांचा पहारा अशा बंदोबस्तात त्यांना तेथे आणण्यात आले होते. गावाला दहशत बसावी, असाही उद्देश असावा पोलिसांचा त्यांना तिथे आणण्यात. त्यातच फौजदार त्यातल्याच एका बारीक चणीच्या तरुणाला मोठ्याने ओरडून म्हणाला, ङ्गङ्घकाय जगन्नाथ, कशाला या नसत्या फंदात पडलाय?फफ एवढ्या बोलण्यावर जगन्नाथ जो उसळला, त्याने हातापायाला बांधलेल्या दोरखंडांना हिसडा दिला. समोरच्या फौजदाराला सरळ उचलला आणि खाली आपटला. सगळे पोलिस धावले, त्यांनी त्या फौजदाराला जगन्नाथच्या हातून सोडवले. सारे वातावरण एकदम तंग झाले. सगळ्या पोलिसांनी बंदुका जगन्नाथवर रोखल्या. जगन्नाथचे इतर सारे सहकारी जगन्नाथच्या अंगावर पडले. त्यांनी पोलिसांना सांगितले, जर मारायचेच असेल तर आम्हा सगळ्यांनाच मारा. आम्ही तुम्हाला जगन्नाथला मारू देणार नाही. सगळ्यांच्या या एकजुटीने त्या दिवशी जगन्नाथ जिवंत राहिला. पुढे त्या सर्वांना कोर्टात हजर करण्यात आले. देशाच्या स्वांतत्र्यासाठी लढण्याची शिक्षा म्हणून त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचीही पर्वा न करणारा हा जगन्नाथ म्हणजेच जगन्नाथआण्णा कोकरे.
१९४२ च्या लढ्यात बारामती तालुक्यातील अनेकजण इंग्रज सरकारविरुद्ध भूमिगत राहून लढत होते. उद्धवराव इंगुले, भाई गुलामअली, बुवासाहेब गाडे, धोंडिबा खोमणे (रामोशी), विठ्ठल जगताप (मंत्री) यांच्यासह जगन्नाथआण्णाही यात सामील होते. या आंदोलनात बारामतीत तारा तोडणे, टपाल कार्यालय बंद पाडणे या कारवायांमध्ये आण्णा पुढे होते. याचवेळी भूमिगत असताना त्यांना पकडण्यात आले. त्यानंतर पणदर्याच्या चावडीत वर सांगितलेला प्रसंग घडला. त्यानंतर साहजिकच तुरुंगवास पदरी आला. वेगवेगळ्या वेळची मिळून एकूण तीन वर्षे जगन्नाथआण्णांनी तुरुंगात काढली. मागे राहिलेली त्यांची पत्नी एकटीच संसाराचा गाडा ओढत राहिली.
खरे तर जगन्नाथआण्णांनी याअगोदर बारामतीत गोविंदराव पवारांच्या सोबत शेतकर्यांसाठी आडत दुकान सुरू केले होते. थोडीफार शेती होती. देशभक्ती अंगात होतीच. शरीर बारीक चणीचे असले तरी भरपूर व्यायामाने कमावलेले होते; पण ४२ चे ङ्गचले जावफ आंदोलन सुरू झाले. स्वातंत्र्य मिळविण्याचे वेड अंगात शिरले. त्यामध्ये आण्णा जे बाहेर पडले ते त्यांनी परत त्या दुकानाकडे पाहिलेही नाही. त्यानंतर स्वातंत्र्यही मिळाले; पण जगन्नाथआण्णांचे मन त्यानंतरही संसारात काही रमले नाही. त्यांच्या थोरल्या मुलाने पुढे अनेक कष्ट काढून शेतीवाडी वाढवली.
स्वातंत्र्यानंतर बारामतीतील प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये आण्णांचा समावेश होता. जिल्हा लोकल बोर्डावर शारदाबाई पवारांसोबत जगन्नाथआण्णाही सभासद होते. गोविंदराव पवारांशी त्यांची घट्ट मैत्री. आण्णांच्या संसाराची काहीतरी व्यवस्था लागली पाहिजे, असे गोविंदरावांना सतत वाटत असे. त्यासाठी आण्णांची गावाकडची काही जमीन विकून काही रक्कम जमा करायला लावली. पणदरे येथील लाड कुटुंबीयांची जमीन विकायची होती. गोविंदरावांनी ती आग्रह करून जगन्नाथआण्णांना द्यायला लावली. त्या काळच्या गावकीच्या पद्धतीप्रमाणे यालाही विरोध झालाच; परंतु गोविंदरावांनी सर्वांची समजूत काढून ती जमीन आण्णांना घेऊन दिली. त्यानंतर त्यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू झाला.
आण्णा मात्र घरापेक्षा लोकांचा संसार उभा करण्याच्या कामात जास्त रमत असत. पणदर्याजवळील हनुमानवाडी येथे त्यांनी तालुक्यातील पहिली दूध संस्था काढली. त्यावेळेस हनुमानवाडीतील सरकारी रेस्ट हाऊसवर तालुक्यातील अनेक महत्त्वाचे राजकीय निर्णय होत असत. याच रेस्ट हाऊसवर यशवंतराव चव्हाण आले असताना जगन्नाथआण्णा आणि भीमदेवराव गोफणे यांनी बारामतीत आयात उमेदवार नको, स्थानिक उमेदवार द्या असे ठणकावून सांगितले होते; परंतु इतक्या ज्येष्ठ कार्यकर्त्यानेही शरद पवार नावाच्या एका तरुण मुलाला आपला नेता का मानले, याची हकीगत जगन्नाथआण्णा नेहमी सांगत असत.
ही ६२ किंवा ६३ सालातली गोष्ट असावी. पणदरे गावात एक सरकारी दवाखाना असला पाहिजे, याबाबत गावातील पुढारी मंडळींची चर्चा झाली; पण सरकारी दवाखाना गावात आणण्यासाठी काय केले पाहिजे हे मात्र कोणालाच माहिती नव्हते. त्यावेळी ही जबाबदारी विठ्ठलराव कोकरे आणि जगन्नाथआण्णा कोकरे यांच्यावर टाकण्यात आली. दोघेही दुसर्या दिवशी बारामतीला आले, अनेक ठिकाणी गेले; पण योग्य दिशा काही दिसेना. त्यावेळी विठ्ठलराव जगन्नाथआण्णांना म्हणाले, आपण काटेवाडीला जाऊ, गोविंदरावांचा मुलगा शरद आहे, तो सध्या यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर असतो. त्याच्याकडे आपल्याला काहीतरी माहिती मिळेल.फफ यावर दोघेही मोटारसायकलवरून काटेवाडीला गेले. शरद पवारांना भेटले. शरद पवारांनी त्यांना तीन दिवसांनी मुंबईत मंत्रालयात येऊन भेटण्यास सांगितले. त्याचवेळी मंत्रालयात प्रवेशासाठीचे दोन पासही त्यांच्या हातात ठेवले. ते ठरल्या वेळी मंत्रालयात पोचले, त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर शरद पवार माणसांच्या गराड्यात उभे होते. या दोघांना पाहताच ते त्यांच्याजवळ आले. आपल्याजवळील फाइलमधून काही कागदपत्रे काढून त्यांच्या हातात ठेवली. पणदरे गावाला सरकारी दवाखाना मंजुर झाल्याची ती कागदपत्रे होती. कामाचा हा झपाटा पाहिल्यावर बारामतीला नेता पाहिजे तो असाच असला पाहिजे, या विचाराने जगन्नाथआण्णांनी या तरुणाचे नेतृत्व स्वीकारले आणि आपल्या आयुष्यभर निभावले.
त्यामुळे ६७ साली शरद पवार नावाच्या या तरुण कार्यकर्त्याला काँग्रेसचे तिकीट मिळाले, तेव्हा पूर्ण ताकदीनिशी त्याचा प्रचार आण्णांनी केला. एवढेच नव्हे तर या तरुणाला तिकीट मिळावे, यासाठी सर्व प्रयत्नही केले; परंतु त्यांच्या आयुष्यातील खरा कसोटीचा क्षण उभा राहिला तो ७२ सालच्या निवडणुकीत. एकीकडे त्यांचे आवडते शरद पवार आणि दुसरीकडे प्रत्यक्ष त्यांचे जावई अॅड्. विजयराव मोरे एकमेकांविरोधात उभे राहिले. शिवाय जातीच्या आधारावर मतविभागणी होण्याचीही शक्यता निर्माण झाली. स्वातंत्र्य चळवळीत तावून सुलाखून निघालेल्या आण्णांना निर्णय घेण्यासाठी क्षणाचाही वेळ लागला नाही. ते जातीच्या राजकारणाविरोधात उभे राहिले. प्रत्यक्ष आपल्या जावयाच्या विरोधात उभे राहिले. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिलेल्या शरद पवारांच्याच बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. केवळ बोलून ते थांबले नाहीत. त्यांनी जाहीर पत्रक काढले, निवडणुकीत जाहीर प्रचार केला. माझा जावई वकील आहे, त्याने वकिली करावी, राजकारण करू नये. शरद पवारांसारख्या नेतृत्वाच्या आड येऊ नये. आपल्या जावयाला पराभूत करा आणि शरद पवारांना निवडून द्या, असे आवाहन ते जाहीरपणे करत होते. हेच आवाहन करण्यासाठी ते आपल्या सर्व पाहुण्यांकडे गेले. आजच्या संधीसाधू राजकारणात आता उदाहरण द्यायलाही असा प्रसंग सापडणार नाही.
शरदरावांवर त्यांचे प्रेम असेच आयुष्यभर राहिले. त्यांच्या विरोधातला एक शब्दही त्यांनी कधी ऐकून घेतला नाही. हनुमानवाडी येथे त्यांच्या मुलांनी नवीन घर बांधले. शरद पवारांखेरीज त्या घरात जायलाही ते तयार होईनात. जोपर्यंत शरद पवार त्या घरी येत नाहीत, तोपर्यंत मी त्या घरी येणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले. त्यावेळी शरदराव मुख्यमंत्री होते. आण्णांच्या मुलांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांना आमंत्रण दिले आणि आण्णांचा हट्ट सांगितला. शरदरावांनी या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला दिवसभराचा वेळ दिला. त्यादिवशी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील बोर्डवर मुख्यमंत्र्यांचा त्यादिवशीचा एकच कार्यक्रम लिहिलेला होता. बारामती तालुक्यातील पणदरे हनुमानवाडी येथे श्री. जगन्नाथआण्णा कोकरे यांच्या वास्तुशांती कार्यक्रमास उपस्थिती.
पवारसाहेबांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या आपल्या जावयाचा पराभव करा, असा प्रचार करणारे आपले वडील जगन्नाथआण्णा कोकरे यांच्याविषयी त्यांच्या कन्येने व्यक्त केलेले विचार…
केवळ साहेबांच्या प्रेमापोटी जावयाला विरोध
पवारसाहेबांचे कुटुंब आणि माझे वडील जगन्नाथआण्णा कोकरे यांचे कुटुंब या दोन्ही कुटुंबांचा घरोबा साहेब राजकारणात येण्यापूर्वीचा आहे. पवारसाहेबांच्या आई शारदाबाई आणि आण्णा हे दोघेही जिल्हा लोकल बोर्डाचे मेंबर होते. ५२ साली दोघेही निवडून आले होते. शारदाबाई आणि माझी आत्या चंद्राबाई या दोघी शिक्षिका होत्या. साहेबांचे वडील गोविंदराव, माझे वडील आणि माझ्या आत्याचे पती संभाजी सोलनकर यांची मैत्री होती. नीरा खरेदी-विक्री संघाच्या जडणघडणीत यांचा सिंहाचा वाटा आहे.
पवारसाहेबांचे मोठे बंधू अॅड्. वसंतराव पवार हे शेतकरी कामगार पक्षामध्ये सक्रिय काम करीत होते. पवारसाहेब काँग्रेस पक्षात काम करू लागले. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेस पक्षाचे चाहते, गांधी आणि नेहरू यांना दैवत मानणारे. अगोदरच पवार कुटुंबाची जवळीक, त्यातून पवारसाहेब आणि आण्णा एकाच पक्षाचे काम करीत असल्याने साहेबांबद्दल आण्णांच्या मनात खूप प्रेम होते. मी पवारसाहेबांना प्रथम पाहिले, ते पुण्याच्या हिराबाग मैदानावर. इंदिरा गांधी यांची सभा होती. सभेत शिरायलाच जागा नव्हती. त्यावेळी शिडशिडीत बांध्याच्या, उत्साहाने भरलेल्या या तरुण कार्यकर्त्याने आण्णांना आणि माझ्यासह त्यांच्या कुटुंबीयांना पहिल्या रांगेत नेऊन बसविले होते.
साहेबांचे कौतुक करताना आण्णा अतिशयोक्ती करत असतात. अधून मधून हिंदीमध्ये बोलत, मला आणि माझे भावांना हसू यायचे; पण आण्णांना काही सांगायची सोय नव्हती. साहेबांच्या निवडणुकीच्या प्रचारात आण्णा तहानभूक विसरून काम करीत. वयोमानानुसार आण्णांना सर्दीचा आणि खोकल्याचा प्रचंड त्रास होता. प्रचारावरून आल्यावर आण्णांना खोकल्याचा प्रचंड त्रास व्हायचा. माझी आई म्हणायची, ङ्गङ्घउद्या प्रचाराला जाऊ नका.फफ आण्णा ङ्गहोफ म्हणायचे. दुसर्या दिवशी आम्ही उठण्यापूर्वी पहाटे लवकर उठून चुलीवर पाणी तापवून अंघोळ करून, कडक कपडे घालून आणि डोक्यावर टोपी चढवून प्रचारासाठी बाहेर पडायचे. पुढे पुढे आम्ही त्यांना सांगायचेच सोडून दिले.
माझे पती अॅड. विजयराव मोरे पवारसाहेबांच्या विरोधात १९७२ आणि १९७८ या दोन विधानसभा निवडणुकीत उभे होते. १९७८ ची निवडणूक अटीतटीची होती. माझी अपेक्षा होती की आण्णांनी शांत राहावे आणि कोणाचीच बाजू घेऊ नये. आण्णांनी माझे न ऐकता कै. भीमदेव गोफणे आणि कै. विठ्ठलराव कोकरे यांच्याबरोबर निवडणुकीच्या प्रचारात माझ्या पतीच्या विरुद्ध पत्र काढले. आमच्या सर्व पाहुण्यांकडे जाऊन पवारसाहेबांचा प्रचार केला. अत्यंत कमी मतांनी मोरे पराभूत झाले. या निवडणुकीनंतरही मोरे आणि कोकरे कुटुंबीयांमध्ये कोणताही तणाव निर्माण झाला नाही. आण्णांच्या प्रेमामुळे अॅड्. मोरे यांना १९९० साली पवारसाहेबांनी आमदार केले. पवार, कोकरे आणि मोरे या तिन्ही तीनही कुटुंबांत राजकीय मतभेद होते; परंतु मनभेद कधीही झाला नाही. त्यामुळे राजकीय जीवनात कोणाच्याही मनात वैरभाव नव्हता आणि नाही.
आण्णांच्या प्रेमामुळे साहेब माझ्या लग्नाला उपस्थित होते. आण्णांना त्यांनी स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीवर घेऊन त्यांचा गौरव केला होता. आण्णांच्या ७५ व्या वाढदिवशी साहेबांनी दिवसभर हजेरी लावली. मध्यंतरी साहेब माझ्या मुर्टी मोढवे गावातील आश्रमशाळेत आले होते. त्यावेळी आण्णांची आठवण निघाली. साहेबांनी आण्णांच्या नावाने वसतिगृहाची इमारत बांधून देण्याचे त्यावेळी ठरविले आणि त्याप्रमाणे इमारत बांधूनही दिली. आण्णा आणि पवारसाहेबांच्या या नात्याबद्दल खूप काही सांगता येईल. स्वत: पवारसाहेबांनी डॉ. राजेश कोकरे यांच्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या उद्घाटनाच्या वेळी सांगितले की माझ्या राजकीय कारकिर्दीचा आलेख जगन्नाथआण्णांच्या सहकार्याशिवाय पूर्ण झालाच नसता.
– अलकाताई मोरे
संकलन : घनश्याम केळकर, बारामती मो. ९८८१०९८१३८











राजकारण हे जात,धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे.जगनाथ अण्णासारखी माणसं खूप कमी असतात.मा.शरद चंद्रजी पवार साहेबावर जण निशावर करणारे,साहेबांसाठी काय पण ,साहेबावर जीव कुर्बान करणारे लाखो कोटी कोटी कार्येक्रते ,साहेबांच्या पाठीशी होते.
देश माझा,राष्ट्र माझे आहे,या देशातील जनता माझी आहे.या देशातील जनतेचा उद्धार करणे,त्यांचा सार्वकालिक उद्धार करणे ,हे माझे परम कर्तव्ये आहे.