अतिरिक्त भारनियमनामुळे संतप्त शेतकरी, युवकांचा इशारा; “मनमानी थांबवा, नाहीतर रस्त्यावर उतरू”
भवानीनगर : महान्यूज लाईव्ह
वाढत्या भारनियमनामुळे संतापलेल्या बारामती तालुक्यातील ढेकळवाडी परिसरातील शेतकरी, युवक आणि ग्रामस्थांनी शनिवारी रात्री थेट इंदापूर तालुक्यातील सणसर येथील महावितरण कार्यालय गाठत तीव्र संताप व्यक्त केला. रात्री तब्बल अकरा वाजता नागरिकांनी कार्यालयासमोर जमून अधिकाऱ्यांना जाब विचारला. “आम्ही भारनियमन सहन करतोय, पण महावितरणाची ही मनमानी किती दिवस सहन करायची?” असा सवाल यावेळी संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला.
दररोज संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंतचे भारनियमन नागरिकांनी नाईलाजाने स्वीकारले. मात्र, त्यानंतरही विविध कारणे सांगत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. शनिवारी रात्री दहा वाजता वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर पुन्हा अकराच्या सुमारास वीज गायब झाली आणि त्यानंतर ढेकळवाडी परिसरातील ग्रामस्थांचा संताप अनावर झाला.
बारामती तालुका बाजार समितीचे संचालक शुभम ठोंबरे यांच्यासह अनेक शेतकरी आणि युवक थेट सणसर येथील महावितरण कार्यालयात दाखल झाले. यावेळी अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधून विचारणा करण्यात आली असता “वरून लोडशेडिंग आहे, आम्ही काही करू शकत नाही” अशी उत्तरे देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले नाहीत, अशी नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या संतप्त वातावरणात ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या अडचणी मांडल्या. “लहान मुले, आजारी नागरिक, वयोवृद्ध व्यक्ती उकाड्यामुळे त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा ते दहा वाजेपर्यंतचे भारनियमन आम्हाला मान्य नसले तरी नाईलाजाने सहन करतो; पण त्यानंतरही रात्री अकरा-अकराला वीज घालवून नागरिकांना वेठीस धरणे थांबवा,” अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर अखेर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या युवकांनी महावितरणाला थेट इशारा दिला. “सततची मनमानी आणि अतिरिक्त भारनियमन सुरूच राहिले तर आम्ही रात्री अपरात्री महावितरण कार्यालयात येऊन बसू. वीज घालवली की आम्हीही कार्यालयात हजर राहू,” असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.
महावितरणाच्या कारभारामुळे शेतकरी, विद्यार्थी, युवक, माता-भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होत असल्याची तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. “महावितरणाने तातडीने परिस्थिती सुधारावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा स्पष्ट इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला.










