माळेगाव कारखान्याच्या नव्या संचालक मंडळाला रंजन तावरेंचा अडथळा.. माळेगावमधील वातावरण तणावग्रस्त..
बारामती : महान्यूज लाईव्ह
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी सत्ताधारी गटाला नाकारत कारखान्यांची सूत्रे पुन्हा राष्ट्रवादीपुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलकडे सोपवली.. मात्र सत्तेतून पायउतार झालेले माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांना काही खुर्ची सुटत नसल्याचेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाने आणि साखर आयुक्तांनी आज नव्या संचालक मंडळाकडे पदभार देण्याचे आदेश दिलेले असतानाही रंजन तावरे यांनी अडथळा निर्माण केला आहे. दुसरीकडे, राज्यभर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू असतानाही रंजन तावरे यांच्या मनमानीमुळे कारखाना कार्यस्थळावर मोठी गर्दी झाली असून तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक २३ फेब्रुवारी रोजी झाली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीळकंठेश्वर पॅनलने २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. त्यानंतर ८ मार्च रोजी कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब तावरे आणि उपाध्यक्षपदी तानाजी कोकरे यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अध्यक्षपदाचा कार्यकाळ ३ एप्रिलपर्यंत असल्याने मुदतवाढ देण्यासाठी दाद मागितली होती. त्यानुसार त्यांना ३ एप्रिलपर्यंत कोणताही धोरणात्मक निर्णय न घेता पदावर राहण्याची मुभा न्यायालयाकडून मिळाली होती.
उच्च न्यायालयात रंजन तावरे यांनी पुन्हा मुदतवाढ देण्यासाठी केलेला अर्ज फेटाळून लावत न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांनी नवीन संचालक मंडळाकडे कार्यभार सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी साखर आयुक्तांनीही पदभार नवीन संचालक मंडळाकडे देण्याचे आदेश देतानाच मागील काळात झालेल्या नोकरभरतीला स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे आणि सर्वच संचालक मंडळ आज पदभार स्वीकारण्यासाठी गेल्यानंतर माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी त्यांना आडकाठी निर्माण केली. सभासदांनी सत्तेतून पायउतार केल्यानंतरही रंजन तावरे हे आपणच अध्यक्ष असून आपली मुदत संपली नसल्याचा दावा करीत नवीन संचालक मंडळाला विरोध करू लागल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या राज्यभर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू आहे. अशा स्थितीत रंजन तावरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कारखाना कार्यस्थळावर मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे कारखान्यावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
..तर अशी वेळच आली नसती : बाळासाहेब तावरे
दरम्यान, आम्ही उच्च न्यायालय आणि साखर आयुक्तांच्या आदेशानुसार पदभार स्वीकारण्यासाठी गेल्यानंतर माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्याकडून मुदत संपली नसल्याचा हास्यास्पद दावा करण्यात आला. त्याचवेळी न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत संपूर्ण प्रशासन आणि नवीन संचालक मंडळाला वेठीस धरण्यात आले. हा संपूर्ण प्रकार निषेधार्ह असल्याचे नमूद करत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी मागील काळात चांगला कारभार केला असता, तर अशा पद्धतीने खुर्चीसाठी कांगावा करून रडीचा डाव खेळण्याची वेळच आली नसती असा टोला रंजन तावरे यांना लगावला आहे.
हा खटाटोप कशासाठी..? : योगेश जगताप
कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी नाकारल्यानंतर पराभव स्वीकारून नव्याने सत्तेत आलेल्या संचालक मंडळाला सहकार्याची भूमिका घेण्याऐवजी माजी अध्यक्षांनी केवळ स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी न्यायालयीन दरवाजे ठोठावले. न्यायालयानेही दिलेली मुदतही आज संपली असताना हा सर्व खटाटोप नेमका कशासाठी असा सवाल उपस्थित करून संचालक योगेश जगताप म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसारच नवीन संचालक मंडळ आजपासून पदभार स्वीकारण्यासाठी कारखान्यावर दाखल झाले आहे. असे असताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून माजी अध्यक्ष विनाकारण प्रशासनाला वेठीस धरण्याचे काम करीत आहेत.











