महाराष्ट्रातील सर्वात भीषण आणि मृत्यूचा सापळा ठरलेला घाट म्हणून आंबेनळी घाटाची ओळख पुन्हा एकदा समोर आली आहे. महाबळेश्वरच्या डोंगररांगांमधून कोकणातील पोलादपूरकडे उतरणारा हा घाट जितका निसर्गरम्य, तितकाच अंगावर काटा आणणारा मानला जातो. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून वळणावळणाने जाणारा हा मार्ग अनेकांसाठी रोमांचक असला तरी क्षणभराचा निष्काळजीपणा थेट मृत्यूच्या दरीत ढकलू शकतो. साताऱ्यातील आठ तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा या घाटाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुमारे ३० किलोमीटर लांबीचा हा घाट महाराष्ट्रातील सर्वात कठीण घाटरस्त्यांपैकी एक मानला जातो. घाटात असंख्य तीव्र ‘हेअरपिन टर्न’, खोल दऱ्या, सततचा उतार आणि अत्यंत अरुंद वळणे आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगरकडा तर दुसऱ्या बाजूला हजारो फूट खोल दरी असल्याने वाहन चालवताना चालकावर प्रचंड मानसिक दबाव निर्माण होतो. विशेष म्हणजे घाटातील काही वळणांवर समोरून येणारे वाहन शेवटच्या क्षणीच दिसते. त्यामुळे वेगाचा अंदाज चुकला किंवा वाहनावरील नियंत्रण सुटले तर अपघात अटळ ठरतो.
पावसाळ्यात तर आंबेनळी घाट अक्षरशः धुक्याच्या चादरीत हरवून जातो. दाट धुके, मुसळधार पाऊस आणि निसरडा रस्ता यामुळे दृष्यमानता काही फुटांवर येऊन थांबते. अनेक वेळा चालकांना रस्त्याची कडच दिसेनाशी होते. रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी धोकादायक बनते. घाटातील बावळी टोक, चिरेखिंड आणि काही तीव्र उताराचे भाग हे ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखले जातात. येथे यापूर्वी अनेक भीषण अपघात झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे.
स्थानिकांच्या मते, या घाटात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अनेकदा चालकांना घाटाचा अंदाज नसतो, काही जण वेगाचा थरार अनुभवायला बेदरकार वाहन चालवतात, तर काही वेळा धुकं आणि पावसामुळे वाहन थेट दरीत कोसळल्याच्या घटना घडतात. यापूर्वी कार ३०० ते ४०० फूट खोल दरीत पडल्याच्या, दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याच्या आणि पर्यटकांच्या वाहनांना अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
२५ मे २०२६ रोजी घडलेली दुर्घटना तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ठरली. साताऱ्यातील आठ तरुण कोकणातून परतत असताना त्यांची स्कॉर्पिओ आंबेनळी घाटात नियंत्रण सुटून थेट ८०० ते १००० फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आणि सर्वांचा जागीच मृत्यू झाला. बचाव पथकांना मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
या घटनेनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेला आंबेनळी घाट आजही पर्यटकांना आकर्षित करतो, मात्र हा घाट ‘रोमांच’ आणि ‘मृत्यू’ यांच्यातील अतिशय धोकादायक रेषा असल्याचे वास्तव प्रत्येक अपघातानंतर समोर येते. त्यामुळे विशेषतः पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी या घाटातून प्रवास करताना वेगावर नियंत्रण, सतर्कता, ओव्हरटेक टाळणे आणि वाहनांची योग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक मानले जाते.










