राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर सध्या कुठे आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असताना त्यांच्या साधेपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. महादेव जानकर सध्या माण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असून, रासप युवक नेते तात्याराम दडस यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर मुक्काम करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ते सध्या राज्यातील राजकारणापासून अलिप्त झाले आहेत का ? भाजप महायुतीतून बाहेर पडल्यानंतर जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष वाढीवर भर दिला आहे. पुन्हा एकदा पक्षवाढीसाठी राज्यातील सर्व सामान्य जनता आणि ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांमध्ये भटकंती करत असलेल्या आणि पक्षाचा बेस असलेल्या धनगर समाजाच्या तांड्यावर जानकर यांनी पुन्हा एकदा आपले लक्ष केंद्रित केले आहे.
पक्षाची पुन्हा एकदा नव्याने पुनर्बांधणी आणि नवीन कार्यकर्तृत्वाची भक्कम फळी उभी करण्याचा यामागचा जानकर यांचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.
कारण राजकारणात बडेजावपणाचे वलय सामान्य मानले जाते. मात्र, माजी मंत्री जानकर आजही आपल्या मुळांशी घट्ट जोडलेले आहेत. पळसवडे (ता. माण) सारख्या छोट्या गावातून संघर्षाने उभे राहिलेले नेतृत्व पद व प्रतिष्ठा मिळूनही जुन्या सवयी विसरलेले नाही.
कार्यकर्त्यांच्या ओढीने जानकर हे तात्याराम दडस यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर पोहोचले. तिथेच त्यांनी साधे जेवण केले आणि वाड्यावरच रात्र काढली. सकाळी उठून पुन्हा ते आपल्या लोकसंपर्क दौऱ्यावर मार्गस्थ झाले. हा केवळ मुक्काम नसून, आपल्या लोकांशी आणि मातीशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. ते स्वतः एक
अभियंता असूनही समाजाच्या उत्थानासाठी राजकारणाचा मार्ग निवडलेल्या जानकर यांचा गेल्या ४० वर्षांपासूनचा संघर्षमय प्रवास अविरत सुरू आहे.
बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना राजकीय गुरू मानून त्यांनी राजकीय संघर्षमय प्रवास सुरू केला. दलित, आदिवासी, ओबीसी आणि विशेषतः धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्य वेचले आहे. आजही ते त्याच उत्साहाने सामान्य कार्यकर्त्यांच्या घरात, वाड्यावर जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत.
‘ना मोठेपणाची हाव, ना गोड बोलून नाटक’ हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. सत्ता असो वा नसो, त्यांच्या वागण्यात बदल झालेला नाही. आजच्या दिखाव्याच्या काळात जानकर हे ‘डाऊन टू अर्थ’ असणे कार्यकर्त्यांसाठी मोठी प्रेरणा आहे. तात्याराम दडस यांच्या वाड्यावरचा हा मुक्काम म्हणजे केवळ दौरा नसून, समाजाप्रती असलेल्या अढळ निष्ठेचाच पुरावा आहे. त्यामुळे ‘जानकर गायब आहेत’ ही चर्चा चुकीची असून ते सध्या जनतेच्या दारात, वाड्यावर आणि बांधावर आहेत.










