राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : महावितरण कंपनीच्या अनियमित वीजपुरवठा आणि भारनियमनाला कंटाळून दौंड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून पाटस, केडगाव, बोरीपार्धी व दापोडी परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. ४) बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तासंतास वीज नसल्यामुळे शेतीचे नियोजन बिघडत असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर दापोडी येथील महावितरण कार्यालयासमोर अमोल भागवत, इब्राहिम शेख, अनिल नेवसे आणि प्रदीप शेलार या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आमरण उपोषण सुरू केले आहे. २४ तास सुरळीत वीजपुरवठा करावा आणि भारनियमन तात्काळ रद्द करावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
तसेच दौंड व शिरूर परिसरातील भारनियमन पूर्णपणे बंद करावे आणि पाटस परिसरातील भानोबानगर, तामखडा, ठोंबरे वस्ती, केकाणवस्ती तसेच गावठाण भागात अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या संतापानुसार, रब्बी हंगाम तोंडावर असताना सायंकाळी ६ ते १० या अत्यावश्यक वेळेतच वीजपुरवठा खंडित होतो. दिवसा वीज नसल्याने शेतात काम करणे कठीण झाले आहे, तर वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे रात्री शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीत शेती तोट्यात जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाला स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, विविध शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असून महावितरण प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.











