मुंबई – राज्यात मंत्र्यांमधील वाचाळवीरांकडून दररोज होणाऱ्या नवनवीन वक्तव्यांना लगाम घालण्यासाठी अखेर संयमी मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतला. दोन कामे कमी करा, मात्र जीभेवर ताबा ठेवण्याचा सल्लाच मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मंत्र्यांच्या बैठकीत दिला.
गेल्या काही दिवसांत राज्यातील संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मंत्री नितीन राऊत, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, यशवंत गडाख, बच्चू कडू आदींकडून झालेली वक्तव्ये चांगलीच गाजली. त्याचे पडसादही उमटले. राज्यात तीन पक्ष एकत्रित असल्याने उगीच चर्चा होते आणि कामाऐवजी लक्ष दुसरीकडेच वळते याबाबत मुख्यमंत्रीही नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आणि वादग्रस्त विधान करणाऱ्यांनी आता थोडे गप्प बसावे अशी सूचना केली. महाविकास आघाडीत उगीच विनाकारण वाद निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली. आता तरी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर प्रसारमाध्यमांच्या चर्चेत राहण्याची सवय असलेले थांबतील का हे पाहणे महत्वाचे आहे.










