पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अनैतिक संबंधांच्या वादातून सासूचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र नियतीने वेगळाच घाव घातला आणि पतीचाच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावासह संपूर्ण तालुका हादरला आहे.
पोलीस तपासानुसार, उंबरगाव येथील एका विवाहित महिलेचे गावातीलच एका व्यक्तीशी संबंध असल्याची माहिती घरच्यांना मिळाली होती. यावरून सासू- सुनेमध्ये सतत वाद होत असल्याचे समोर आले आहे. या वादातून सासू कायमचा अडथळा दूर करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेच्या प्रियकराने तिला विषारी द्रव्याची बाटली दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनेच्या दिवशी घरात पिण्यासाठी ठेवलेल्या पाण्याच्या कळशीत हे विष मिसळण्यात आले. रात्री सासूने ते पाणी घेतले; मात्र चव वेगळी वाटल्याने तिने ते पाणी बाजूला ठेवले. योगायोगाने तेच पाणी तिचा मुलगा समाधान याने पिले. काही वेळातच त्याला उलट्या व प्रकृती बिघडल्याची लक्षणे दिसू लागली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर गावात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत लोहार समाजाच्या वतीने पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी महिला सारिका आणि तिचा कथित प्रियकर शेखर यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे एका कुटुंबावर शोककळा पसरली असून अनैतिक संबंधांच्या संशयातून उभ्या राहिलेल्या कटकारस्थानाने निरपराध जीव गमावल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.











