संपादकीय : ज्ञानेश्वर रायते
या देशात अजून काही पवित्र राहिलंय का? एकेकाळी ज्या पदाकडे समाज आदरानं, तरुण वर्ग आशेनं आणि देशभक्त मनानं पाहायचा — तेच प्रशासन आज भ्रष्टाचाराच्या दलदलीत मान गाडून बसलंय.
देशातील प्रतिष्ठित प्रशासन सेवेत प्रवेश मिळवणारे अधिकारी भ्रष्टाचाराच्या जाळ्यात सापडले तर सामान्य जनतेचा विश्वास कोसळतो. अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी सृष्टी देशमुख यांच्या पतीवर तब्बल १० कोटी रुपयांच्या लाचखोरीचा आरोप झाला आहे!
२०१९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी नागार्जुन गौडा, जे त्या वेळी मध्यप्रदेशच्या हरदा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते, त्यांनी अवैध खाणकाम करणाऱ्या कंपनीवरील ५१ कोटींचा दंड फक्त ४,००० रुपयांवर आणला, असा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. या “सवलती”च्या मोबदल्यात त्यांनी १० कोटींची लाच स्वीकारल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे.
आयएएस सृष्टी देशमुख, एक नाव, जे लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान होतं. “मेहनत केल्यास स्वप्न पूर्ण होतात” याचं प्रतीक मानलं गेलं. पण आज त्यांच्याच पतीवर, वरिष्ठ आयएएस नागार्जुन गौडा यांच्यावर, १० कोटींच्या लाचखोरीचा आरोप आहे. होय, तब्बल ५१ कोटींचा दंड फक्त ४,००० रुपयांवर आणण्यासाठी १० कोटींची ‘डील’! हे वाचतानाच रक्त खवळतं.
देश चालवायचं की विकायचं?
प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवताना अधिकारी राष्ट्रसेवेची शपथ घेतात. पण जेव्हा ती शपथ पैशाच्या नोटांमध्ये वितळते, तेव्हा आपण ‘प्रशासन’ नावाच्या संस्थेवर विश्वास ठेवायचा तरी कसा? “सेवा, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी” ही मूल्यं आता बहुतेक फक्त भाषणांपुरतीच उरली आहेत. एकीकडे शेतकरी, सैनिक, आणि सर्वसामान्य माणूस दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करतो आणि दुसरीकडे ‘देशसेवक’ नावाने ओळखले जाणारे अधिकारी कोट्यवधींची लाच घेतात.
“पती आरोपी, पत्नी चर्चेत” — हीदेखील व्यवस्था बघा!
सृष्टी देशमुख यांनी काही चुकीचं केलं नसलं, तरी त्यांच्या पतीच्या भ्रष्टाचारामुळे त्या चर्चेत आहेत. समाज माध्यमावर लोकांचा राग आणि निराशा उफाळली आहे. कारण ज्या व्यक्तीकडून प्रेरणा घेतली, त्यांचं नाव आता “भ्रष्टाचार” या शब्दाशी जोडलं जातंय. हा फक्त एका अधिकाऱ्याचा नाही, तर संपूर्ण प्रशासनाच्या नीतिमत्तेचा पराभव आहे.
अशी प्रकरणं थांबवणार कोण?
प्रश्न असा आहे की, या सत्तेच्या आणि पैशाच्या नशेत बुडालेल्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार कोण? शासन यंत्रणा जबाबदार ठरणार का? की ही प्रकरणं “तपास सुरू आहे” या वाक्याने झाकून टाकली जाणार? देशाला लाचखोरीपेक्षा धोकादायक काय आहे? तर, सुन्न झालेला समाज! आपण रोज बातम्या वाचतो, राग येतो, दोन मिनिटं बोलतो, आणि मग विसरतो. हीच आपल्या समाजाची भीषण अवस्था आहे. लाचखोर प्रशासनापेक्षा धोकादायक आहे, निष्क्रिय जनता! कारण जिथं लोक मौन बाळगतात, तिथं भ्रष्टाचारचाच जयघोष होतो. आजचा निष्कर्ष एकच, देश चालवणाऱ्यांनी पैशाची पूजा सुरू केली, तर देश चालवणं थांबतं. आणि त्या दिवशी, भारत “महा-राष्ट्र” राहणार नाही — तर “महा-बाजार” बनेल.











