गणेश मंदा प्रभाकर लोंढे, बारामती
कालची घटना सर्व बारामतीकरांना सुन्न करून गेली. ओंकार आचार्य यांचा व दोन्ही कन्याचा दुर्देवी अपघात काळजावरती खोलवर जखम करून गेला. दिवसभर भेटणारा प्रत्येक माणूस याच घटनेबद्दल हळहळ व्यक्त करताना दिसतोय… कित्येकांना तर जेवण करताना सुद्धा अपराधीपणा वाटत होता. तर काहींची झोप उडाली.
पण या सगळ्या माणसांच्या बोलण्यात एक गोष्ट लक्षात येत होती की, कालच्या अपघातानंतरचा विडिओ समाजमध्यमामध्ये खुप मोठ्या प्रमाणात viral झाला. कित्येक group मध्ये लोकांनी share केला. ओंकार यांच्या अखेरच्या क्षणाचा तो काही सेकंद आकांत लोक मोबाईल मध्ये टिपून सगळीकडे वेगाने पाठवत होते.
पण खरच आशा संवेदनशील गोष्टीचे फोटो विडिओ माणसानी शेअर करण्यात कोणता मोठा सामाजिक फायदा आहे? या उलट ओंकारला अशा अवस्थेत पाहून त्याच्या जवळचे कितीतरी मित्र, नातेवाईक, आई, पत्नी यांना बसणारा धक्का हा किती मोठा असेल? याची कुणी कल्पना सुद्धा का करत नाही?
अशा मानसिक धक्क्यात दुसरा दिवस उजाडला आणि सकाळी त्याच्या वडीलांचे देखील दुर्देवी निधन झाले. आपण साधं रक्तदान करताना बाटली पहिली, तरी डोळे गरगर फिरतात. अशा काळात आपल्या जिवलग माणसाचा रस्त्यावरती सांडलेला रक्ताचा सडा पाहून त्या माणसांना कोणत्या वेदना होत असतील याचाही विचार करायला हवा!
अमेरिकेत 9/11 चा इतका मोठा हल्ला झाला तरी अमेरिकन मीडिया ने रक्ताचा एक थेंबसुद्धा टीव्ही वरती प्रसारित होऊ दिला नाही हे शहाणपण आपण कधी शिकणार आहोत? गाडीच्या चाकाखाली अडकलेला फोटो टाकून वडिलांची महती सांगताना आपण त्यांच्या जवळच्यांना दुसरे मरण अनुभवायला लावत आहोत.
काही फोटो मृताचे चेहरे blur करून रक्तपात न दाखवता श्रद्धांजली वाहणे हे नक्कीच शहाणपणाचे ठरले असते. मात्र सोशल मीडियाच्या काळात आपण आपल्या संवेदना इतक्या बोथट केल्या आहेत की, कोणत्या गोष्टी शेअर कराव्या आणि कोणत्या नाही हे भान आपण हरवून बसलोय. खरं आहे ना?











