राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली आहे. त्यामुळे सध्या दौंड पंचायत समितीला कोणी वालीच राहिला नाही अशी परिस्थिती आहे. कामानिमित्त पंचायत समितीमध्ये येणाऱ्या नागरिकांना विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आणि टेबल रिकाम्याच दिसत आहेत.
त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय वारंवार टेबलावर साहेब येतात का? हे पाहण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे दौंड पंचायत समितीच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत माहिती अशी की, दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांची बदली काही दिवसांपूर्वी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी शिरूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना तात्पुरता पदभार दिला आहे. त्यामुळे ते शिरूर आणि नंतर दौंडचा कामकाज बघत आहेत.
त्यामुळे तालुक्यातील कामानिमित्त येणाऱ्या अनेक नागरिकांना गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांची बदली झाली, याची कल्पना नाही आणि त्यातच प्रभारी गटविकास अधिकारी हे कधी तरी येतात. परिणामी वरिष्ठ अधिकारी नसल्याने पंचायत समितीच्या विविध विभागाच्या कार्यालयामध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मजा झाली आहे. सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी कारभार सुरू असल्याचे चित्र पंचायत समितीत पाहायला मिळत आहे.
मंगळवारी (दि ३) हे चित्र कामानिमित्त पंचायत समितीत आलेल्या अनेक नागरिकांना पाहायला मिळाले. पंचायत समितीचा समाज कल्याण विभाग सोडला तर इतर विभागात मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खुर्ची आणि टेबल रिकामा असल्याचे चित्र दिसून आले. तिथे उपस्थित असलेला एका कर्मचाऱ्याला विचारले असता, ते कुठे गेल्यात, आम्हाला माहिती नाही, कधी येणार हे सांगता येत नाही. तर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यामुळे ते नाहीत असे उत्तर ऐकायला मिळाले.
त्यामुळे अनेक नागरिकांना सध्या पंचायत समितीमध्ये हेलपाटे मारावे लागत असून कामे वेळेत होत नसल्याने गैरसोय होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दौंड पंचायत समितीचे आस्थापन विभागाचे अधिकारी यांच्याकडे मंगळवारी ( दि ३) किती अधिकारी हजर आहेत आणि किती रजेवर आहेत ? याबाबत माहिती घेण्यासाठी गेलो असता, तेही त्यांच्या टेबलवर उपस्थित नव्हते. तर प्रभारी गटविकास अधिकारीही उपस्थित नव्हते. त्यामुळे या संदर्भात वरिष्ठ अधिकारीच उपस्थित नसल्याने तक्रार नेमकी कोणाकडे करावा असा प्रश्न नागरिकांना पडला होता.











