‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरूच राहणार..!
पुणे : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितल्यामुळे यापुढे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे प्रसारण होणार नसल्याची अफवा पसरवली जात असल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी कलेला नेहमीच विशेष प्राधान्य दिले आहे. असे असताना अर्धवट माहितीच्या आधारे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अफवा पसरवल्या जात असून याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा डॉ. कोल्हे यांनी दिला आहे.
मागील काही दिवसांपासून ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली झी मराठी या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांनी सांगितल्यामुळे ही मालिका बंद होणार असल्याची अफवा पसरवली जात होती.यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सोशल मीडियावर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेसंदर्भात शरद पवार यांना गोवण्याचे एक दुर्दैवी प्रयत्न सध्या सुरू आहे. शरद पवार साहेबांचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यापासून पवारसाहेबांनी मला कधीही कोणत्याही बाबतीत रोखलेले नाही. उलट या मालिकेला मदतीबाबत अनेकदा विचारणा केल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले. या मालिकेबाबत अफवा पसरावणारांवर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दिली असून लवकरच याबाबत कारवाई होईल असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
अर्धवट चुकीच्या माहितीच्या आधारे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात अनेक पोस्ट्स फिरत आहेत. या पोस्ट्स सोशल मिडियावर पसरविणाऱ्यांनी मालिका संपूर्ण पहावी आणि मग प्रेक्षक या नात्याने जरूर टिप्पणी करावी.. मालिका रोज रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर सुरू आहे याची नोंद घ्यावी..!
– डॉ. अमोल कोल्हे










