बारामती : महान्यूज लाईव्ह
४ जुलै २०२०…वेळ रात्री दहाची… बारामतीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या एकदम वाढली म्हणून चिंता असतानाच बारामतीच्या एका डॉक्टरांना फोन येतो…तो फोन असतो, नगरच्या हिवरेबाजार मधील..! तेथील 4 वर्षाच्या मुलाच्या मेंदूत गाठ झाली म्हणून शस्त्रक्रिया सुरू असताना पुण्यातील खासगी रुग्णालयात जीवन ज्योत मालवते आणि सकाळी झालेल्या घटनेनंतर केवळ दवाखान्यात आलेल्या प्रत्येकाचा कोरोना नमुना घेण्याच्या नादात असलेल्या रुग्णालयात प्रशासन रात्री दहापर्यंत तो बाळाचा चिमुकला देह ताब्यात देत नाही, कुटुंबीयांची तगमग सुरू असते, बाहेर कोरोना दबा धरून बसलेला असतो आणि म्हणून अत्यंत विमनस्क अवस्थेत हे कुटुंबीय गाडीतच स्वतःला बंद करून बसलेले असतात.. दवाखान्यातून कोणीच काहीच दाद देत नाही.. अशावेळी एकाला त्या बारामतीकर डॉक्टरांचा पर्याय सुचतो आणि मग मात्र सुरू होते नियम व कायद्याच्या कचाट्यात माणुसकीच्या संवेदनशीलतेची लढाई…!
काल नगर जिल्ह्यासाठी बारामतीकरांच्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या ठरल्या, तशा त्या दोन्ही सकाळपासून सुरू झाल्या होत्या, त्यातील एक होती राजकारणाची ..! दुसरी होती समाजकारणाची..!! राज्यभरात एव्हाना बहुतेकांना माहीत आहे की, बारामतीत आधी समाजकारण चालते आणि मग राजकारण..!! पण काल पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढावे म्हणून शिवसेनेचे पाच नगरसेवक बारामतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटण्यासाठी आणले आणि त्याच क्षणी त्या नगरसेवकांचा राष्ट्रवादी प्रवेश झाला…आता ही राजकीयदृष्ट्या नगरसाठी अतिशय महत्वाची बातमी होती. त्यामुळे त्या बातमीची दिवसभर आणि अगदी संध्याकाळी चर्चा सुरू होती. दुसरी एक घटना सकाळीच घडली, मात्र त्याची चर्चा कुठे झाली नाही, कारण ती एका कुटुंबासाठी मर्यादित होती, मात्र ती होती जीवन मरणाची..!!
हिवरे बाजार येथील 14 वर्षीय चिमुकल्या बाळाला मेंदूत गाठ आहे म्हणून त्रास होत होता तो त्रास अचानक वाढला आणि त्याच्यावर तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज भासली त्यामुळे त्यास तीन जुलैच्या रात्रीच पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते 4 जुलै रोजी म्हणजे काल सकाळी त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असताना त्यांची जीवनज्योत मालवली.
सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने दवाखान्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाचे कोरोना ची तपासणी केली जाते आणि तेवढ्या कालावधीत जर रुग्णाचा मृत्यू झाला तर कोरोनाचा अहवाल येईपर्यंत मृतदेह ताब्यात दिला जात नाही. याही बाळाच्या बाबतीत असेच होते. रुग्णालयाने घशातील स्त्रावाचा नमुना पाठवला, तो नेमका सरकारी राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेत पाठवला. त्याचा अहवाल येईपर्यंत कुटुंबियांना थांबावे लागेल असे रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले, परंतु खासगी दवाखान्यांनी खासगी प्रयोगशाळेत तातडीचे नमुने तपासावेत अशा स्वरुपाची एक सूचना यापूर्वीच राष्ट्रीय स्तरावरून दिली गेली होती. दुसरी गोष्ट रूग्णालयातील खर्च हा पूर्णपणे कुटुंबीय करणार असल्याने रुग्णालयाला देखील तात्पुरता, तातडीच्या स्वरूपात खाजगी प्रयोगशाळेतून अहवाल घेता आला असता, मात्र राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेवरच रुग्णालय ही अडून राहिले आणि सकाळी दहा वाजता आलेले नातेवाईक बाहेर पुण्यामध्ये कोरोना चा कहर सुरू असल्याने गाडीतील काचा बंद करून गाडीतच बसून राहिले. बाहेर पडावे आणि न जाणो चुकून कोरोनाची बाधा झाली तर आपल्यामुळे इतरांना त्रास होईल अशा स्वरूपाची भीती त्यांना होती. त्याचप्रमाणे रुग्णालयात कोरोनाचे इन्फेक्शन होऊ शकते या भीतीने हे सर्व कुटुंबीय गाडीतच बसून राहिले.
संध्याकाळ झाली तरीदेखील अहवाल येत नसल्याचे पाहून कुटुंबीयांची तगमग वाढली. मुलाचे आई-वडील तिकडे विमनस्क अवस्थेत हिवरेबाजार मध्येच होते. त्यामुळे नातेवाईकांनी व कुटुंबीयांनी रुग्णालयाकडे आर्जव करण्यास सुरुवात केली. मात्र अहवाल येईपर्यंत मृतदेह देण्यात रुग्णालयाने नकार दिला, मग हिवरेबाजार येथील, परंतू कामकाजाच्या निमित्ताने बारामतीत राहणाऱ्या विकास वाळुंजकर यांनी हिवरे बाजारमधूनच बारामतीतील भूलतज्ञ व कोरोना हेल्पलाईनचे सदस्य डॉ. सुजित अडसूळ यांच्याशी संपर्क साधला.
अडसूळ हे रात्री दहा वाजता एक शस्त्रक्रिया संपवून बारामतीच्या महिला रुग्णालयातून घरी जात होते, त्यांना ही सर्व प्रकाराची कल्पना दिल्यानंतर त्यांच्या संवेदनशील मनाने अस्वस्थतेतून थेट प्रशासनाशी संपर्क साधला. यामध्ये रुग्णालयातील ज्यांनी शस्त्रक्रिया केली ते डॉक्टर, रुग्णालयाच्या ऍडमिनिस्ट्रेशन विभागाच्या सहकारी अशा सार्यांशी ते सातत्याने बोलत राहिले. केंद्र सरकारच्या गाईडलाईन देखील त्यांनी मिळविल्या.. त्याबाबतीतही ते बोलत राहिले आणि मग मात्र जेव्हा कायद्याचा कीस पडू लागला तेव्हा मात्र बारामतीकरांची निर्वाणीची भाषा त्यांनी वापरली आणि ती मात्र तातडीने प्रभावी ठरली.. मी ही गोष्ट आज मुक्कामाला असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या कानावर घालेन आणि आपण अत्यंत चुकीचे वर्तन करत आहात अशा स्वरूपाची निर्वाणीची भाषा वापरल्यानंतर मात्र हॉस्पिटल प्रशासन हलले आणि रात्री बारा वाजता राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेत स्वत: थांबून रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी अहवाल मिळवला. बाळाचा अहवाल अर्थातच कोरोना निगेटिव्ह होता.तब्बल चौदा तासानंतर बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबीयांनी एका मरणानंतर ची लढाई संपली आणि अशा परिस्थितीत देखील बारामतीकरांचे आभार मानले. बारामतीकर नेहमीच कोणत्याही आपत्ती असो की, इष्टापत्ती..सदैव समाजाबरोबर असतात. स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करता ते इतरांसाठी धावून जातात हा संदेश या निमित्ताने सर्वांनाच मिळाला.
रात्री हा सर्व प्रसंग हिवरेबाजारचे सरपंच व पद्मश्री पोपटराव पवार त्यांनाही माहीत होता. डॉक्टर सुजीत हे देखील त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधून होते. बाळाचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पवार यांनीदेखील समाधान व्यक्त केले.
विकास वाळुंजकर – अशा प्रकारचा प्रसंग कोणाच्याही वाट्याला येऊ नये, यासाठी खासगी रुग्णालयांनी स्वतःच्या काही मार्गदर्शक सूचना तयार करायला हव्यात, कारण ज्यांच्या घरातील कोणीतरी जाते, त्यालाच त्याचे दुःख कळते, अशा प्रकारचे दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. सुजित अडसूळ – खाजगी रुग्णालयांनी अशा वेळी खासगी प्रयोगशाळांचा आधार घेतला पाहिजे, मृतदेह फार काळ अडवता येत नाही हे माहीत असूनही आणि आपण सर्व खर्च वसूल करत असूनही, आपण इतर पर्याय निवडत नाही अशी जी रुग्णालयांची धारणा आहे, ती बदलली पाहिजे तर आणि तरच रुग्ण आणि डॉक्टरांचे, रुग्णाचे नातेवाईक आणि दवाखान्याचे नाते चांगले राहील.











अशीच गरिबांना नेहमी मदत करत जा.चांगले नाव कळवशील.