ज्ञानेश्वर रायते, बारामती
मुंबईतील पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कलिंगडावर संशयाची सावली पडली आणि काही दिवसांतच बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ग्राहकांनी पाठ फिरवल्याने मुंबईत तब्बल 20 ट्रक कलिंगडे विक्रीअभावी पडून राहिल्याची स्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले. दुर्दैवाची गंमत म्हणजे मात्र आता अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अहवालाने या सगळ्या चर्चेला पूर्णविराम दिला.
एफडीएच्या तपासणीत डोकाडिया कुटुंबाच्या घरातून जप्त केलेल्या कलिंगडात कोणतीही भेसळ आढळलेली नाही. कलिंगडाचा रंग, गोडवा किंवा आकार वाढवण्यासाठी कोणतेही रसायन किंवा कृत्रिम घटक वापरले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय बिर्याणी, पाणी, भात, चिकन, खजूर आणि मसाले अशा इतर खाद्य नमुन्यांमध्येही भेसळ आढळली नसल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.
त्यामुळे या मृत्यूंचं कारण कलिंगड नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं असून आता फॉरेन्सिक आणि बॅक्टेरियल तपासणीच्या अहवालाकडे लक्ष लागलं आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट मात्र प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे अफवांचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. कोणताही ठोस पुरावा नसताना कलिंगडावर संशय घेतला गेला आणि बाजारात त्याची मागणी कोसळली. ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. शेतात घाम गाळून पिकवलेलं उत्पादन एका क्षणात ‘संशयित’ ठरलं.
प्रत्येक वेळी अशाच प्रकारे अफवा आणि अर्धवट माहितीमुळे शेतीमाल बदनाम होतो, बाजार ढासळतो आणि नुकसान शेतकऱ्यांच्या माथी मारलं जातं. नंतर सत्य समोर आलं तरी त्या नुकसानीची भरपाई कुणीच करत नाही. शेतकरी पुन्हा नव्याने उभा राहतो, पण त्याच्या जखमा कायम राहतात.
या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी आणि समाजाने अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. कोणत्याही घटनेचं पूर्ण सत्य समोर येण्याआधीच ‘मीडिया ट्रायल’ केल्याने केवळ एका उत्पादनाची नाही, तर हजारो कुटुंबांच्या उपजीविकेची हानी होते. पायधुनी प्रकरणाने हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे की, कलिंगड निर्दोष ठरलं, पण शेतकरी मात्र पुन्हा एकदा बळी ठरला.










