राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : होणारा नवरा पसंत नसल्याने नवरी मुलीने त्याला जीवे मारण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि श्रीगोंदा येथील गुंडांना सुमारे दीड लाख रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार यवत पोलिसांनी उघडकीस आणला असून या प्रकरणात पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून नवरी मुलगी फरार आहे.
ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. ही घटना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील खामगाव गावच्या हद्दीत 27 फेब्रुवारीला सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या आसपास घडली. आदित्य शंकर दांगडे (वय 19, रा. गुपलवडगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर), संदीप बादा गावडे (वय 40 रा. मुघलवडगाव ता. श्रीगोंदा), शिवाजी रामदास जरे (वय 32, रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) व इंद्रभान सखाराम कोळपे (वय 37, रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा) व सुरज दिगंबर जाधव (वय 36, रा. काष्टी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी सागर जयसिंग कदम (वय 28, माहीजळगाव, ता. कर्जत जि अहिल्यानगर) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कदम हा एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतो. सागर आणि मयुरी सुनिल दांगडे यांचा विवाह होणार होता. मात्र मयुरीला सागर पसंद नव्हता.
त्यामुळे तिने सागराला जीवे मारण्याची सुपारी दीड लाख रुपयांना दिली होती. आरोपींनी सुपारी घेतल्यावर खामगाव फाटा येथे सागरला अडविले व आरोपी म्हणाले, तु मयूरीशी लग्न केले तर तुला दाखवितो? असे म्हणून सागरला लाकडी दांडक्याच्या सहाय्याने जबर मारहाण करून गंभीर दुखापत केली होती.
याप्रकरणी सागर कदम यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास यवत पोलीस करीत असताना, पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य दांगडे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, सदरचा गुन्हा हा मयूरी व संदीप गावडे यांच्या सांगण्यावरून केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.
त्यानंतर पोलिसांनी उर्वरित चार आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तसेच गुन्हा करते वेळी वापरण्यात आलेली एक चारचाकी गाडीदेखील जप्त केली गेली आहे. मयूरी व संदीप गावडे यांच्या सांगण्यावरून केल्याचे आरोपींनी कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी उर्वरित चार आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तसेच गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली एक चारचाकी गाडीदेखील जप्त केली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर गुन्हयातील महिला आरोपी मयुरी ही अद्याप फरार आहे. पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम 109, 61 (2), 126 (2) ही वाढीव कलमे वाढविण्यात आलेली आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने आहेत.











