उज्वल निकम लोकसभा निवडणुकीत निवडणूक हरले. वर्षा गायकवाड या निवडून आल्या. निवडणूक हरल्यानंतर पुन्हा उज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील बनवण्याचा घाट सरकारने घातला आहे. यावर सामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचाच आधार घेत अभिनेते किरण माने यांनी लोकशाहीच्या या अभिनव वर्मावर नेमके बोट ठेवले आहे. किरण माने यांनी लोकांना जागृत रहा, असाच रेटा ठेवला तरच सरकारवर अंकुश राहील अशा स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त करत एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल केली आहे.
उज्वल निकम यांच्या प्रचाराच्या वेळी त्यांचा जन्म हा हनुमान जयंतीच्या दिवशी झाला असे सांगत भाजपने जोरदार मोहीम राबवली होती. त्याचाच आधार घेत किरण माने यांनी या पोस्टमध्ये सुरुवात केली आहे. किरण माने यांनी लिहिले आहे की, हनुमान जयंतीचा जन्म असलेले निकम वकील लोकसभेला भाजपाकडुन उभे राहिले. राहु द्या. लोकशाही आहे. नागरिक म्हणून त्यांचा अधिकार होता. ते पडले. ठीकै. लोकशाहीत जनतेने स्वत:ला हवा असलेला उमेदवार निवडण्याचा हक्क बजावला. विषय कट.
पण आता उज्जवल निकम यांची पुन्हा ‘सरकारी वकील (विशेष)’ पदावर नियुक्ती झाली, हे मात्र लोकशाहीसाठी घातक आहे ! आजवर अशाच पदांचा गैरवापर करून या भाजपाने विरोधी पक्ष, लोकशाही, संविधान आणि देश पोखरला आहे.
भक्तांनी कितीही डिंग्या मारूद्यात की आमच्या नेत्यानं एकट्याच्या बळावर दोनशे चाळीस वगैरे आणले. पण ही मोठी फेकूगिरी आहे. ईडी, सीबीआय, आयटी, इलेक्शन कमिशन आणि महत्त्वाच्या पदांवर बसवलेली लोचट-लाचार-लोभी माणसं यांच्या बळावर भाजपाला या सिटस् मिळाल्यात हे जगजाहीर आहे. हे सगळं काढून टाकलं तर ते औषधालाही शिल्लक रहाणार नाहीत.
आता जरा विचार करा भावाबहिणींनो.. भाजपासारख्या पक्षाला धार्जिण असलेला निकमांसारखा माणूस सरकारी वकीलासारख्या महत्त्वाच्या पदावर असेल आणि समोर काॅंग्रेस, आप, ओरिजिनल शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्याचा, नेत्याचा खटला सुरू असेल.. तर हा संशय बळावतो की, तो मुद्दाम त्याला अडकवण्यासाठी जोर लावणार… किंवा समोर भाजपाचा माणूस असेल तर असेही होऊ शकते की, तो मुद्दाम त्याला सुट देऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार ! शक्यता आहे की नाही? आपल्या धडावर असलेलं आपलं डोकं वापरून सांगा.
यामुळे राजकीय विरोधकांबाबतीत बायस्ड निर्णय दिले जाऊ शकतात. हे एकंदरीत नैतिकतेसाठी आणि आपल्या लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असलेल्या न्यायपालिकेसाठी खुप धोकादायक आहे. यावर प्रत्येकाने बोलले पाहिजे असे मला वाटते. जनतेतून रेटा आला, तरच सरकारच्या अशा निर्णयांवर अंकुश राहू शकतो.…याठीच सांगतोय, यापुढे प्रत्येकानं अशा गोष्टींवर आवाज उठवला तरच आपला देश या हुकूमशाहीच्या जोखडातनं मुक्त होईल. बोला. बोलत रहा. जय महाराष्ट्र… जय संविधान… जय शिवराय… जय भीम !
किरण माने त्यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरू आहे. एकंदरीतच उज्वल निकम यांना सरकारी वकील बनवण्याच्या प्रक्रियेवर सोशल मीडियात नेटकऱ्यांनी देखील तीव्र टीका केली आहे.











