राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गावर आजपासून म्हणजे 21 फेब्रुवारीपासून उंडवडीच्या टोलनाक्यावर तोल वसुली करण्यास मान्यता मिळाले आहे याचे राजपत्र कालच प्रसिद्ध झाले असून आज पासून या टोलवरून वसुली सुरू केली जाणार आहे अर्थात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत आश्वासन देताना 60 किलोमीटरच्या दरम्यान कोणताही टोलनाका असणार नाही तो असेल तर तो बंद करा अथवा तो बेकायदेशीर आहे असे वक्तव्य केले होते ते प्रत्यक्षात खोटे असल्याचे समोर आले आहे.
बारामती तालुक्यातील उंडवडी येथील या टोलनाक्यावर आजपासून टोल वसुली सुरू केली जाणार असून यामध्ये कार, जीप, व्हॅन अशा वाहनांसाठी एकेरी वाहतूक 65 रुपये तर एकापेक्षा जास्त खेपांसाठी शंभर रुपये तर मासिक पास एका महिन्यासाठी एकेरी फेऱ्यांसाठी 2245 रुपये आकारण्यात येणार आहे.
मिनी बस आणि तत्सम गाड्यांसाठी एकेरी वाहतुकीसाठी 110 रुपये, एका दिवसात जास्तीत जास्त दोन खेपांसाठी 165 रुपये आकारले जाणार असून, बस, ट्रक अशा दोन एक्सेल वाहनांसाठी एकेरी शुल्क 230 रुपये तर दुहेरी शुल्क 340 रुपये आकारले जाणार आहे. तीन एक्सल कमर्शियल वाहनांसाठी एकेरी शुल्क 250 रुपये तर दुहेरी शुल्क 375 रुपये आकारले जाणार आहे.
चार ते सहा एक्सेलच्या मोठ्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी 360 रुपये एकेरी, तर दुहेरी फेरीसाठी 535 रुपये आकारले जाणार आहेत. सात किंवा अधिक एक्सेलच्या अवजड वाहनांसाठी एकेरी शुल्क 435 रुपये तर दुहेरी शुल्क 655 रुपये आकारले जाणार आहे. टोल प्लाझा च्या 20 किलोमीटर अंतराच्या परिसरात राहणाऱ्या अव्यवसायिक स्थानिकांच्या वाहनासाठी 2023 24 एका वर्षासाठी 330 रुपये मासिक पास आकारण्यात येणार आहे.
हे सर्व दर 38 किलोमीटर पूर्ण झालेल्या लांबीच्या महामार्गासाठी लागू असून, यामध्ये बाह्य वळणाची लांबी 18 किलोमीटर व चार लेन रस्त्याची लांबी 19 किलोमीटर असणार आहे. टोल भरण्याच्या वेळेपासून 24 तासाच्या आत परतीचा प्रवास करणाऱ्या वाहनांना 25% सूट दिली जाणार असून, टोल भरल्यापासून एक महिन्याच्या आत 50 एकेरी प्रवास करणाऱ्या सर्व वाहनांसाठी 33 टक्के सूट दिली जाणार आहे. या टोल वसुलीसाठी राजस्थानची गणेश गहरिया कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही एजन्सी नेमण्यात आली आहे.
नितीन गडकरी संसदेत खोटे बोलले की लोकांची फसवणूक?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हे रस्ते सुरू आहेत. अर्थात हा महामार्ग सुरू करण्यापूर्वीच संसदेमध्ये नितीन गडकरी यांनी एक वक्तव्य केले होते. त्यामध्ये 60 किलोमीटरच्या आत कोणताही टोलनाका असणार नाही अशा स्वरूपाचं आश्वासन त्यांनी संसदेत बोलताना दिले होते. प्रत्यक्षामध्ये पाटसनंतर काही अंतरावरच हा उंडवडीचा टोल नाका असून या टोलनाक्यापासून चाळीस किलोमीटरच्या आत बेलवाडीचा टोलनाका असणार आहे.
त्यामुळे हे दोनही टोलनाके तसे पाहिल्यास 60 किलोमीटरच्या अंतराच्या आत असल्याने खरोखरच हा टोलनाका स्थानिकांनी बंद करावा का? जो नितीन गडकरींच्या आश्वासनानुसार आहे, असा देखील प्रश्न आत्ताच उपस्थित केला जात आहे. पाटस पासून सराटीपर्यंतच्या कामासाठी दोन वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन कंपन्या काम करत होत्या. त्यांच्यावर मेहरबान होण्यासाठी हे दोन टोलनाके निर्माण केले जात आहेत का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात असून सामान्यांची ही लुटालुट असल्याचाही प्रश्न आतापासूनच उपस्थित केला जात आहे.











