लक्ष्मण जगताप, बारामती
एक मार्क घालविला. तुला कळत नाही का? जराशा त्रासिक चेहऱ्याने आई मुलीला ओरडत होती. जाताना त्या मायलेकी माझ्याजवळून गेल्याने आईचे ते ओरडणे माझ्या कानावर पडले. मला क्षणभर वाटले, आपण त्यांच्याशी बोलावे. परंतु त्या चिडलेल्या आईला पाहून माझा विचार बदलला. नकळत मी ही मार्कांच्या विचारात गर्क झालो. एका एका मार्कांसाठी पालक मुलांना रागवितात. त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा ठेवतात.
मुलगी होती दुसरीची. परीक्षा होती वीस गुणांची. त्या मुलीने वीसपैकी एकोणवीस गुण मिळविलेले. फक्त एक गुण घालविला म्हणून दुःख किंवा त्रागा करण्यापेक्षा तिने मिळवलेल्या गुणांचे कौतुक करुन खरं तर तिला आनंद देणे गरजेचे होते. एक गुण घालविला म्हणून तिला आपल्या आईचा ओरडा खावा लागला याचे वाईटही वाटले.
शंभर मार्कांच्या असणाऱ्या परीक्षांच्या बाबतीतही असेच घडते. मुलांनी त्यांची पूर्ण क्षमता वापरुनही अपेक्षेएवढे गुण मिळाले नाहीत किंवा एखादा मार्क गेला तरी मुलांना पालकांची खूप बोलणी ऐकून घ्यावी लागतात.
लहानपणापासून आपण मुलांना मार्कांच्या स्पर्धेत धावायला लावतो. समाजातील एक स्टेटस सिम्बाॕल म्हणून आपण मार्कांकडे बघतो.त्यावर आपली समाजातील पत आणि प्रतिष्ठा ठरत असते. त्यासाठी मुलांना मार्कांच्या शर्यतीत धावण्याशिवाय पर्याय उरत नाही. फक्त मार्क आणि मार्क करुन आपण मुलांना किती ताण देत आहोत याचाही विचार केला पाहिजे. परीक्षेत अनावधानाने, उत्तर येत नसेल म्हणून एखादा मार्क गेला असेल तर पालक म्हणून आपण पाल्याला समजून घेतले पाहिजे.
अरे तु छान मार्क मिळविलेत. तुझे खूप अभिनंदन! असाच प्रयत्न करत रहा. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत असे बोलून त्याला प्रेरित करणे पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. एका मार्कासाठी मुलांना रागावून आपण मिळालेल्या यशावर विरजण घालतो आणि आनंद गमावून बसतो.
आज सगळं शिक्षण परीक्षा आणि मार्क यात अडकून पडले आहे. फक्त मार्कांची मोजपट्टी लावून मुलांची गुणवत्ता मोजू नये. मार्क म्हणजे फक्त एक संख्या आहे. मार्कांच्या पलीकडेही खूप काही आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भाषण संभाषण, गायन वादन, चित्र, कथन, हस्त, खेळ इ. अनेक कौशल्ये आणि आज सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाल्याचे व्यवहारज्ञान विकसित होणे ही काळाची गरज बनली आहे. शिक्षणातून जीवनकौशल्ये विकसित होणे म्हणजे खरं शिक्षण. मुलांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.
मार्क मार्क करुन मुलांची इतर कौशल्ये आपण मारुन टाकतो. मार्कांच्या शर्यतीत त्याकडे दुर्लक्ष होते. शंभर मार्क आहेत, परंतु निर्णयक्षमता नसेल तर काय उपयोग ? शाळेतील परीक्षेत कमी मार्क असणारे नव्हेत तर नापास झालेले सुद्धा जीवनाच्या परीक्षेत यशस्वी झालेत. अशी कितीतरी माणसे आहेत.
ज्यांनी मार्कांच्या पलीकडे जाऊन आपल्या आयुष्याला आकार दिला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन आपले आयुष्य घडविले. आपल्या अंगी असणाऱ्या मुलभूत कौशल्यांच्या बळावर उत्तुंग यश मिळवले आहे. त्यामुळे मार्कांत अडकून पडण्यापेक्षा मुलांना एक चांगला परिपूर्ण आणि संवेदनशील माणूस बनविण्यासाठी प्रयत्न करुयात हेच शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट होय. ( लेखक बारामती येथील शाळेत शिक्षक आहेत.)











