सोलापूरमध्ये भाजपला धक्का. भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला प्रवेश
सोलापूर जिल्हा हा नेहमीच माझ्या आवडीचा जिल्हा, सोलापूरचा पालकमंत्री असताना अनेक महत्त्वाचे निर्णय- शरद पवार
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामती मध्ये आले, तेव्हा शरद पवार यांना भेटण्यासाठी गोविंद बाग या ठिकाणी राज्यभरातून अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
गोविंद बाग या ठिकाणी सोलापूर मधील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील व असंख्य कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सोलापूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, सोलापूर जिल्हा नेहमीच विचारांच्या पाठीशी उभा राहतो. हा जिल्हा पुरोगामी विचाराला पहिल्यापासून मान देत आला आहे. त्यामुळेच एक काळ असा होता की, रामदास आठवले यांना या जिल्ह्यात उमेदवारी दिली. हा जिल्हा रामदास आठवले यांना माहीत होता, ना रामदास आठवलेंना हा जिल्हा ओळखत होता. तरीही विचाराच्या पाठीशी इथले मतदार उभे राहिले आणि रामदास आठवले यांना एकदा नव्हे, दोनदा नव्हे तीनदा निवडून दिले. त्यामुळे सोलापूर जिल्हा हा नेहमीच माझ्या आवडीचा जिल्हा राहिला आहे असेही मत शरद पवार यांनी बारामतीतील गोविंद बाग या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर व्यक्त केले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, सोलापूरचा पालकमंत्री असताना मी काही महत्त्वाचे निर्णय घेतले.यामध्ये उजनी धरण पूर्ण करण्याबरोबरच त्याचे कालवे पूर्ण करण्यासाठी नियोजन केले प्रयत्न केले. येथील शेतकरी कष्टाळू आहेत. त्यामुळेच येथील फळबागा अधिक समृद्ध होत गेल्या. काल-परवा मंगळवेढ्याच्या दौऱ्यातही सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगार महिला मला प्रत्यक्ष भेटून सांगत होत्या की आम्ही तुमच्या सोबत आहोत. या पाठबळामुळे मला नेहमीच उभारी मिळवत गेली आहे. ऊर्जा मिळत गेली आहे.असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी भाजपवरही टीका केली.भाजप हा पाडापाडी करून सत्तेवर येणारा पक्ष आहे.यांची गोव्यात सत्ता नव्हती. भारताचा नकाशा उभा धरला,तर तळाला गोवा इथून सुरुवात होते. गोवा, मध्य प्रदेशात भाजपची सत्ता नव्हती. पाडापाडी करून,पक्ष फोडून, आमदार फोडून ते सत्तेवर आले. कर्नाटकमध्ये काल-परवा त्यांची सत्ता गेली. तामिळनाडूमध्ये,आंध्र प्रदेशमध्ये भाजप नाही. महाराष्ट्रात काय झाले सर्वांनाच माहित आहे. फक्त गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. देशातील राजस्थान, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक, झारखंड,पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ आणि पंजाब या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही असेही शरद पवार म्हणाले आहेत.