जयंत पाटील यांची भूमिका विचारांबाबतीत स्पष्ट, मणिपूर कडे सरकार लक्ष देत नसेल तर चिंतेची गोष्ट : पवार म्हणाले!
विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
बारामती : राज्याच्या विकासासाठी आम्ही भाजपसोबत हात मिळवणी केली. असे अजित पवारांकडून सांगितले जात आहे. मात्र ईडीच्या कारवाईच्या धाकाने अजित पवार गट भाजपासोबत गेला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर आज शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
जयंत पाटील यांच्या भावाला नोटीस आल्याचं कानावर आलं आहे. सत्तेचा गैरवापर करून पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटीसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न जयंत पाटील यांच्याबाबत घडत आहे. पण जयंत पाटील यांची भूमिका विचारांबाबतीत स्पष्ट राहतील असं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच कालच्या बैठकीत ईडीच्या कारवायांवर चर्चा झाली नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केल आहे.इंडिया आघाडीची ३१ ऑगस्ट रोजी बैठक होत आहे.हयात हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे.त्यानंतर १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून बैठक सुरू होईल. दुपारपर्यंत ही बैठक चालणार आहे. ही बैठक आयोजित करण्याची जबाबदारी मी स्वत:उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी घेतली. आम्ही उत्तमरित्या बैठक पार पाडू. काँग्रेसने त्यांच्याकडून बैठकीला कोण उपस्थित राहणार याची यादी दिलेली नाही. त्यामुळे सोनिया गांधी येणार की नाही हे माहीत नाही.
मणिपूरच्या हिंसेवरून बोलताना शरद पवार म्हणाले, मणिपूर हा विषय मणिपूरपर्यंत मर्यादित नाही.पूर्व पश्चिमेच्या राज्यांना लागून इतर देशांच्या सीमा आहेत. मणिपूरकडे सरकार लक्ष देत नसेल तर चिंतेची गोष्ट आहे. आम्ही संसदेत हा विषय मांडला. पण यावर चर्चा होऊ दिली नाही. आम्ही एका कलमाखाली चर्चेची मागणी केली, ती पूर्ण केली नाही.
पंतप्रधान संसदेत मणिपूरवर बोलले. पण ते मणिपूरवर अत्यंत कमी वेळात बोलले. मणिपूरच्या लोकांना दिलासा देण्यासाठी जी सक्तीने भूमिका घेण्याची गरज होती. ते काहीच दिसलं नाही. त्यांच्या भाषणात त्याचा अभाव होता. त्यातून काही पदरात पडलं नाही. तुमच्या हातात नऊ वर्ष राज्य आहे.
नऊ वर्षात तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही तीस वर्षापूर्वी काय झालं सांगता. तीस वर्षापूर्वीचं वर्कींग असतं. ते संपलं. आज त्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे. मणिपूरला भाजपचं राज्य आहे. काँग्रेसने चांगलं काम केलं नाही म्हणून भाजपला संधी दिली. पण तुम्हाला नऊ वर्ष संधी देऊन तुम्ही काय दिवे लावले?. आमची काही वंचितशी चर्चा झाली नाही. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित चर्चा झाली आहे. त्याबाहेर आम्ही गेलो नाही.असही शरद पवार बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.