जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
भोर : हिंदवी स्वराज्याची साक्ष देणारा किल्ले रोहिडेश्वर ( रोहिडा ) गडावर जाणाऱ्या प्रथमदर्शनीय प्रवेशद्वाराजवळील तटबंदीचा बुरुज पावसामुळे ढासळला आहे. भोरपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या किल्ले रोहिडेश्वर (रोहिडा) च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुधवार, १० ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे ढासळल्यामुळे गडावर पर्यटकांना जाणे अवघड झाले आहे, तर काही ठिकाणी पावसामुळे भेगा पडल्या असल्यामुळे तटबंदी ढासळण्याच्या अवस्थेत आहे,
ढासळलेल्या तटबंदीचा दगडी, माती, चुनखडीचा राडारोडा हा पर्यटक ज्या वाटेने गडावर चढतात त्या वाटेवर आला असल्यामुळे गडावरील पायवाट बंद झालेली आहे. यावर बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबद्दल आपले ट्विट केले आहे
काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे?
स्वराज्याची साक्ष देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रोहिडेश्वराच्या (रोहिडा) प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुरुज नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्याची डागडुजी दुरुस्ती करणे आवश्यक आहे. गडप्रेमी नागरीकांसाठी हा किल्ला अतिशय महत्त्वाचा आहे. यासह इतिहासाच्या अभ्यासक व नागरीकांसाठी हा उज्ज्वल वारसा आहे. या वास्तुचे जतन व संवर्धन व्हायला हवे. जिल्हाधिकारी पुणे यांनी याबाबत सकारात्मक विचार करुन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
रोहिडेश्र्वर किल्ला
हिंदवी स्वराज्य स्थापनेत शिवाजी महाराजांनी किल्ल्याचा अतिशय समर्पक उपयोग करून मराठ्यांचे स्वराज्य निर्माण केले अशा शिवकाळातील रोहिडा किल्ला भोर तालुक्यातील बाजारवाडीजवळ आहे. ऐतिहासिक कागदपत्रातून याला ‘विचित्रगड’ व ‘बिनीचा किल्ला’ अशा नावानेदेखील संबोधले जाते.
गडाची समुद्रसपाटीपासून उंची ११०५ मीटर म्हणजेच ३६२५ फूट आहे. बाजारवाडी गावापासून किल्ल्यावर चढण्यासाठी सर्वांत चांगली मळलेली पायवाट असून गडावर चढण्यासाठी एक तास लागतो. गडावर प्रवेश करण्यासाठी एकमेव दरवाजा असून, त्याची बांधकाम शैली अशी आहे की दरवाजा आपणास दिसून येत नाही. हा दरवाजा उत्तराभिमुख आहे. प्रथमदर्शनी असलेल्या दरवाजाच्या चौकटीवर भक्कम गणेश पट्टी असून तिच्यावर मिहराब आहे.
शासनाचे दुर्लक्ष
याच प्रवेशद्वाराच्या शेजारील असणारी तटबंदी बुरूज पावसामुळे ढासळला असल्यामुळे गडाचे ऐतिहासिक महत्त्व कमी झालेले दिसत आहे. शासन एकीकडे गडसंवर्धनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये ठराविक गडकिल्ल्यांसाठी खर्च करत आहे; परंतु जे किल्ले पुरातत्त्व खात्याकडे आहेत त्या किल्ल्यांसाठी शासन निधी उपलब्ध करत नसल्याचे दिसून येत आहे.
गावकऱ्यांची गडाची दुरुस्तीची मागणी
इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले किल्लेसंवर्धन फक्त कागदावरच असल्याचे एक उदाहरण असून, गडाच्या तटबंदीची दुरुस्ती करण्याची मागणी गडकरी शंकर धावले व चंद्रकांत भागवत यांनी केली आहे.