ठाणे: महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर अस्वस्थ असलेले राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज नॉट रीचेबल झाले आहेत. त्यांनी काल रात्रीच ट्विट करून आपण 24 तासासाठी अज्ञातस्थळी जात असून फोनवरही उपलब्ध राहणार नाही असे सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पाच ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे, मात्र त्यांनी आपण या वाढदिवशी उपलब्ध होणार नसल्याचे श सांगितले आहे. हे का? तर लोकशाहीची दररोज होणारी हत्या आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि अत्यंत स्वार्थी मनाची माणसं मी जवळून पाहिली. असं ट्विट करत त्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात जोरात चर्चा सुरू आहे.
त्यांनी केलेलं ट्विट पुढील प्रमाणे, उद्या 5 ऑगस्ट… माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकत 5 तारखेला मिळते. पण मला माफ करा. ह्या 5 तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही.
देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला अजिबात वाटत नाही.
तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकत आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरिही मला माफ करा. मी आज रात्री बारापासून ते उद्या रात्री बारापर्यंत स्वतःचा फोन बंद करून मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे.
लोक किती स्वार्थी असतात हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा. मी उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.