सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर
म्हसोबावाडीत घडलेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुर्दैवी असून बेलवाडी गावच्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. काल शुक्रवारी (दि.4) सायंकाळी पाटील यांनी मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. व रात्री अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित राहत मृत कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली.
म्हसोबावाडी येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, परशुराम बन्सिलाल चव्हाण, मनोज मारूती चव्हाण, जावेद अकबर मुलाणी यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आंम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना आगामी काळात सहकार्य केले जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
या घटनेची सर्व माहिती आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून दिली, त्यावेळी त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. राज्य शासन मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी म्हसोबावाडी येथील विहीर दुर्घटनेची सविस्तर माहिती ॲड. शरद जामदार व सहकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिली.