विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी रोहित पवार उपस्थित होते.
त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी मोदींनी एक स्टेटमेंट केलं होतं. ते राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल होतं. त्यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादी भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष असल्याचं म्हटलं होतं. मला आनंद आहे की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना शपथ दिली, त्यामुळे त्यांनी या आरोपातून राष्ट्रवादीला मुक्त केलं. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे असं शरद पवार म्हणाले.
अजित पवार यांनी आणि सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली असं मी म्हणेल. माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नाही. सहकाऱ्यांची भूमिका येत्या २ ते ३ दिवसात स्पष्ट होईल. १९८० साली मला ५६ आमदार आम्हाला सोडून गेले. त्यावेळी ५ ते ६ आमदार घेऊन पुन्हा पक्ष उभा केला. ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाहीये. मी पुन्हा लोकांच्यामध्ये जाईल आणि त्यांना माझा निर्णय सांगेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
६ जुलैला पक्षाची बैठक बोलावली आहे. माझा तरूण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे. मी उद्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पक्ष म्हणून तुम्ही काहीही भूमिका घेणार का? आम्ही लोकांना आमचा निर्णय घेऊ.आम्ही भांडण करणार नाही. लोकांची भूमिका समजून घेऊ, असं शरद पवार यांनी म्हटल्याने आता सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
अजित पवार यांच्यावर कारवाई करणार का?असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करणार. पटेलांनी जबाबदारी पार पाडली नाही,असं शरद पवार म्हणाले आहेत. पक्ष फुटला आणि घर फुटलं असं मी म्हणार नाही.असं शरद पवार म्हणाले आहेत. गेले त्यांची चिंता नाही,मला त्यांच्या भवितव्याची चिंता नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत.