दौंड, महान्युज लाईव्ह
केंद्र सरकार हे मूलभूत पायाभूत सुविधा आज सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यास यशस्वी झाले आहे असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केले.
दौंड तालुक्यातील चौफुला येथील आयोजित भारतीय जनता पार्टी, लोकसभा प्रवास योजना अंतर्गत लाभार्थी व बूथ प्रमुख मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी आमदार राहुल कुल, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल , रंजन तावरे, नामदेव बारवकर, प्रेमसुख कटारिया, नंदु पवार तसेच विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल म्हणाले की,केंद्र शासनच्या विविध योजना या गोर गरीब जनतेसाठी देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेतून आज संपूर्ण भारत देशात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तब्बल २ कोटी कुटूंबांना हक्काचे घर देण्यात आले. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत २२ कोटी नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले.
प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजने मार्फत ८० कोटी गरीब कुटुंबाना मोफत धान्य वाटप करण्यात हे सरकार यशस्वी झाले आहे. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मार्फत दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत मिळत आहे. भाजपा सरकारच्या काळात काश्मीरचा विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
दौंड भाजपचे आमदार राहुल कुल म्हणाले की, केंद्र शासन व महाराष्ट्र सरकाकडून वेळोवेळी मदत मिळत आहे. कोरोना काळात ५ हजारहुन अधिक रुग्णांना मदत करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांबाबत मदत मिळाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या साखर कारखाना संदर्भातील धोरणामुळे राज्यातील साखर कारखान्यांना १० हजार कोटी रुपयांचा फायदा झाला . कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आज भाजपा दौंड तालुक्यात उभारी घेत आहे. सर्व लाभार्थी योजना तालुक्याच्या शेवटच्या जनतेपर्यंत देण्यासाठी आमचा पर्यंत राहील.
भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी @९ चे सहसंयोजक संजय टंडन म्हणाले, आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आज भाजपा मोठ्या ताकदीने उभी आहे आणि याचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. १२० कोटी लोकांना कोरोनाच्या काळात लसीकरण करण्यात आले. शेवटच्या गरीब जनतेपर्यंत नरेंद्र मोदी यांनी काम केले आहे. काँग्रेसच्या काळात जे काम झाले नाही, ते काम आज नरेंद्र मोदी यांनी केले आहेत. वीज, शिक्षण, आरोग्य, सुविधा देण्यात भाजपा सक्षम बनली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू भागवत यांनी केले तर आभार दिनेश गडधे यांनी मानले.











