बारामती : महान्यूज लाईव्ह
सर्वसामान्यांना व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकविण्यासाठी ही आम आदमी पक्षाची स्वराज्य यात्रा आहे. या यात्रेमुळे या सर्वसामान्यांना ताकद मिळून त्यांची सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी केले. आम आदमी पक्षाची पंढरपूर ते रायगड ही स्वराज्य यात्रा बारामतीत पोचली त्यावेळी ते बोलत होते. दि. २८ मे रोजी पंढरपूरहून निघालेली ही स्वराज्य यात्रा दुसऱ्या दिवशी बारामतीत पोचली.
शहराच्या मुख्य बाजारपेठेतून निघालेली ही यात्रा नगरपालिकेसमोर सभेमध्ये रुपांतरीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. आजच्या घडीला सगळ्यात मोठा प्रश्न हा संविधान आणि लोकशाही वाचविण्याचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शिक्षण आणि आरोग्यासाठी लागणाऱ्या भरमसाठ खर्चामुळे गरीबांना या सुविधा मिळू शकत नाहीत. यावर आम आदमी पार्टीने यशस्वी पर्याय शोधला असून आज दिल्लीतील सरकारी शाळेत आमदारांची मुले सर्वसामान्य मुलांसोबत शिकत आहेत. आज दिल्लीत उत्तम अशा आरोग्याची सोय सर्वसामान्यांनाही उपलब्ध आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये उभे राहिलेले हे मॉडेल आपल्याला महाराष्ट्रातही उभे करायचे आहे. यासाठी पक्षाचे विचार समाजाच्या तळागाळात पोचविण्याची ही यात्रा असल्याचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी यावेळी सांगितले.
कार्यकर्त्यांच्या उदंड प्रतिसादाने बारामती शहर दुमदुमून गेले होते. यावेळी पक्षाच्या विविध योजनांची माहिती देणारे पथनाट्यही सादर केले गेले. यावेळी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सह प्रभारी गोपाल इटालिया, यात्रेसोबत असणारे पक्षाचे पदाधिकारी धनंजय शिंदे, देवेंद्र वानखेडे, विजय कुंभार, जिल्हा सचीव अक्षय शिंदे, सर्फराज मोमीन, घनश्याम मारणे, पुरंदर तालुका प्रमुख दत्तात्रय कड, एम. एम. पाटील, यासह राज्याच्या विविध क्षेत्रातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेसाठी बारामतीकरांनी मोठी गर्दी केली होती.
खराखूरा आम आदमी
यात्रेचा रथ ज्यावेळी सभास्थानी पोचत होता, त्यावेळी एक उंचापूरा माणूस तेथे असणाऱ्या दुचाकी हलवत होता. त्यानंतर त्याने त्या जागेची स्वच्छता करण्यासाठी झाडू हातात घेतला. अतिशय साध्या वेशात असलेली ही व्यक्ती म्हणजे राज्याचे सह प्रभारी गोपाल इटालिया होते. गुजरातमध्ये आम आदमी पक्ष रुजविण्यात प्रमुख भुमिका असलेले इटालिया या सभेच्या वेळी स्टेजवर न जाता सर्वसामान्यामध्ये बसून सभेच्या नियोजनात एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे राबत होते. ‘ हा खरा आम आदमी ‘ या शब्दात बारामतीकरांनी इटालियांचे कौतुक केले.