सचिन पवार : महान्यूज लाईव्ह
सुपे : बारामती तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यासह आसपास या जिल्ह्यातही प्रसिद्ध असलेला ऐतिहासिक सुपे गावातील हजरत ख्वाजा शाहमन्सुर बाबा दर्गा ट्रस्टचं मुख्य विश्वस्तपद सध्या चर्चेत आहोत असून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याला कारण औरंगाबादच्या वक्त बोर्डाने दिलेले एक पत्र!
औरंगाबादच्या वक्फ बोर्डाने सध्या कार्यरत असणारे मुख्य विश्वस्त नाव चुकून टाईप झाले असे पत्र सध्या सर्वत्र फिरत आहे. हे पत्र खरे की खोटे यावरून रंगलेला वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला असून पोलीस अधिकाऱ्यांनाही यामध्ये लक्ष घालावे लागले आहे. अर्थात त्यामुळे येथील दर्गा ट्रस्टला मुख्य विश्वस्त ( चिफ ट्रस्टी ) सध्या कोणीच नसल्याचा संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना देखील यामध्ये लक्ष घालावे लागले असून, सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन काळे हे स्वत: औरंगाबादच्या राज्य वक्फ मंडळाशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले. यातून येत्या दोन दिवसात मुख्य विश्वस्त कोण याची माहिती वक्फ मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे जर मुख्य विश्वस्तांचे नाव चुकून टाईप झाले होते तर येथील दर्गा ट्रस्टला मागील चार वर्षापासून मुख्य विश्वस्तच कोणी नसल्याचा प्रकार समोर येत आहे. सध्या मुख्य विश्वस्त म्हणून युनुस कोतवाल कारभार पाहत आहेत, मात्र यांचे पदच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे यातून समोर आले आहे. या संभ्रमावस्थेतून कोतवाल यांनी या पदावर नसताना मागील चार वर्षापासुन दर्गा ट्र्स्टचा कारभार कसा काय हाकला? याची चर्चा आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे येथील गट क्रमांक ७७२ मधील जनाई कॅनालसाठी संपादित केलेल्या जमीनीचा मोबदला मिळणेबाबतचा विषय आला होता. त्यानुसार वक्फ मंडळाने भुसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रविण साळुंके यांना संदर्भाचे पत्र १८ मे ला देण्यात आले आहे. या पत्राच्या अनुषंगाने स्थळ पाहणी व सविस्तर चौकशी करुन स्वयंस्पष्ट अहवाल मूळ अभिलेखासह कार्यालयास सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्या प्रतीमध्ये अर्जदाराच्या नावापुढे मुख्य विश्वस्त ( चिफ ट्रस्टी ) असे नजरचुकीने टाईप करण्यात आले असल्याचे वक्फ मंडळाचे म्हणणे आहे.
अर्थात अर्जदार युनुस कोतवाल यांना हजरत ख्वाजा शाहमन्सुर दर्गा ट्रस्टचा मुख्य विश्वस्त असल्याबाबतचे राज्य वक्फ मंडळाचे कोणतेही आदेश नाहीत. तसेच वक्फ मंडळात बदललेला पहिला अहवाल क्रमांक ४२/३५७/२०१८ आणि दुसरा अहवाल क्रमांक ४२/२६९/२०२० असा असून त्यामध्ये मात्र त्यांचे नाव सामील आहे. तसेच सदरचे दोन्ही अहवाल सुनावणीत प्रलंबित असून, त्यावर कोणतेही निर्णय अद्याप घेण्यात आले नाहीत अशी माहिती राज्य वक्फ मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे. तसेच एक पत्र माहितीसाठी युनुस कोतवाल यांना देण्यात आले आहे.
दरम्यान यासंदर्भातील वाद हा सुपे पोलिसांकडे गेला आहे. यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांच्या उपस्थितीत दर्गा ट्रस्टच्या नव्या व जुन्या अशा सर्वच विश्वस्तांना बोलावून नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी दोघांची बाजू समजावून घेतली आहे, औरंगाबाद राज्य वक्फ मंडळाशी बोलून लवकरच वाद मिटवण्यात येईल असे काळे यांनी सांगितले. त्यानंतर नुकताच काळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, वक्फ मंडळाशी संपर्क झाला असून दोन दिवसात मुख्य विश्वस्त कोण आहे, याबाबत लेखी पत्र वक्फ मंडळ देणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
दरम्यान सध्या स्थितीत कारभार पाहत असणारे युनुस कोतवाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मीच या पदावर कार्यरत असुन आमची बदनामी करण्याचा प्रयत्न काहींकडून होत आहे.