नानाची टांग
ही वाट दूर जाते, स्वप्नातल्या गावा..
माझ्या सोन्याच्या शहरात गांजा, गुटख्यावाल्यांचाच गवगवा..!
कोट्यवधींचा धूर त्यांच्या घरी.. बड्या बड्या आलिशान गाड्या..!
आता गावामंदी पाटलाचा नाही, रुबाब असतो तुझाच भावड्या..!
मंडळी आम्ही सांगतो, सत्याची कथा.. सत्याची वार्ता..
सोन्याच्या शहरात आता कोटींच्या बाता..!
ज्याची वाटावी सहानुभूती, तोच असतो, खरा चोर..
कसं झटपट श्रीमंत होताहेत, असले सारे हरामखोर..!!
१००, ५०० साठी आमचा बाप जेव्हा खातो खस्ता..
खडी, वाळू, गांजा अन गुटख्यामधून जातो आता श्रीमंतीचा रस्ता..!!
पोरांना सुदीक भला वाटतो, गॅंग बनवणारा सराईत चोरटा..
फ्लेक्समधून आता दररोज उगवतो, तो भाई असतो खरंच भुरटा..!!
कालपरवा रस्त्यात म्हणे गाडीत सापडले कोटीच्या कोटी..!
खरंच सांगा.. भाऊ, एवढा पैका कुठे देते आमची शेती, आमची माती?
कायदा, बियदा कायच नाही..पैशांत मोजतात सारे..!!
नोटांची बंडले मोजताना पोलिससुध्दा बोलले.. बापरे..!!
एक गांजावाला तिरुपतीला निघतो, विशाखापट्टणमला पोचतो..
तोच आणतो गांजा.. अन गांजासवे नितीमत्ता विकतो..!
एवढं घडूनही आम्हाला वाटते, त्याच्यावरच झालाय अन्याय..
न्याय करावा म्हणतो आम्ही, तोवर गांजाची ही खबर ऐकतो..!!
सोन्यासारखं गाव माझं.. सोन्यासारखा कायदा, बियदा..
दिड वितीच्या पोटासाठी जेव्हा गाव झालं परांगदा..
सरळ जगावं म्हणलं, पण झालाय साराच वांदा..!!
चोराच्याच घरात चोरी.. भेजाचा झाला कांदा..!!
ट्रक अख्खा लुटला गेला..काहीच शिल्लक राहीलं नाही..
या कानाची त्या कानाला खबर कशी लागली नाही..!
सूर्य उगवला, उजेड पडला.. दरोडा लपला गेलाच नाही..
लाखांचा दरोडा घातला ज्यांनी, मिसरूड सुध्दा फुटले नाही..!!
काल अचानक गांजावाला, आला तसा गेला गावा,
कोणीतरी ध्यानात ठेवला, सांगितलं पोलिस भावा..!!
रस्त्यावरच्या लढाईत कायदा बोलला त्याला, आता खैर नाही..!!
गांजावाला मोठा तालेवार..पण आता बोलायची सोय नाही..!!
गांजावाला गाजला मागे, आता गुटखावाल्याची आली बारी..!
लाख देतो म्हणूनही ऐकली नाही राजेश, सचिनची स्वारी..!
कोटींच्या बदल्यात लाख होते, पण बिचारे बधले नाहीत..
पाच-पन्नासच्या चिरीमिरीचा आरोप करता, तेव्हा हे प्रामाणिक आठवत नाहीत..!!
सलाम आमचा पोलिस भावा, इमान राखले, वर्दीशी..
अशीच निधडी छाती लागेल, आता लढाया बेईमानीशी..!!
खरं सांगू, आमचं कुणाशी वैर नाही.. पण बेईमानीची खैर नाही..!
समाजाची गरज, भागवण्या ज्यांची हिंमत होत नाही..
अशा भिकार श्रीमंतांची वाटते आता, गरज नाही..!!
फिरस्ता जेव्हा फिरू लागला, काल पहाटेच्या पहारी..
तेव्हाच पोलिस म्हणत होते, अब कानून की बारी..!
लाचखोरांनाही मेसेज दिला, दोन शिपायांची ही कथा..!
दिवस अजूनही उजाडत नाही, लोकशाहीची हीच व्यथा..!!