रामभाऊ जगताप, बारामती
महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी गतिमानता अभियानांतर्गत राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाला उत्कृष्ट संकल्पनेचा मधाचे गाव मांघर च्या निर्मितीसाठी राज्यस्तरीय दुसरा पुरस्कार मिळाला. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांच्यासमवेत झळकलेले बिपिन जगताप चांगलेच चर्चेत आले.
नागरी दिनानिमित्त सह्याद्री अतिथिगृह येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप,पाटील, महेश भोसले हे उपस्थित होते. मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा,उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप,डी आर पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
राज्य शासनाच्या वतीने दर वर्षी विशेष काम करून प्रशासकीय कामात गती आणून शासनाच्या कामाचा फायदा थेट लोकांना करून दिलेल्या विशेष कार्याचा गौरव राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान राबवून शासकीय संस्था व अधिकारी कर्मचारी यांना पुरस्कार दिला जातो.
यावर्षी सदर पुरस्कार राज्याच्या खादी व ग्रामोद्योग विभागास मिळाला आहे. मधाचे गाव मांघर या गावाला रोजगारक्षम, निसर्गसंवर्धन करून स्वावलंबी केल्याबद्दल मंडळाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. राज्यात मधाचे गाव ही नाविन्यपूर्ण संकल्पना मंडळाच्या मुख्य अधिकारी अन्शू सिन्हा यांनी मांडली आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, डी आर पाटील व कर्मचारी वर्गाने ही संकल्पना यशस्वीपणे राबविली.
याकरता सातत्याने मांघर गावात भेट देऊन तेथील लोकांमध्ये जनजागृती करणारे बिपिन जगताप हे पुणे जिल्ह्यात चांगले चर्चेत आले आहेत. बारामती तालुक्यातील कांबळेश्वर हे असून ते यापूर्वी महाबळेश्वर येथील मध संचालनालयाचे संचालक होते. व्यसनमुक्त युवक संघ या सामाजिक चळवळीतून पुढे येतानाच पत्रकारिता देखील केलेले बिपिन जगताप हे राज्य सरकारच्या सेवेत आले आणि गडचिरोली, चंद्रपूर सारख्या ठिकाणी कामाची सुरुवात करताना त्यांनी सामान्य लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले.
मधाच्या गावात हजारो पर्यटकांनी भेटी दिल्या असून मधमाशाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. गावातील महिला व युवकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला असल्याने गाव स्वयंपूर्ण झाले आहे.