दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
उन्हाची तीव्रता वाढू लागताच एरवी सर्वाधिक पावसाचा अनुभव घेणाऱ्या वाई तालुक्याला टंचाईच्या झळा भासू लागल्या आहेत. मात्र पंचायत समिती व महसूल प्रशासन या संभाव्य टंचाईसाठी दक्ष असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाई तालुक्यात भूजल पातळी खालावत असल्याने पठारावरील काही गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. सध्या गुंडेवाडी गावाला सोमवारपासून गावाच्या मागणी नुसार टॅकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे.
नागरिकांनी घाबरुन न जाता पाणी मागणी प्रस्ताव वाई पंचायत समितीकडे पाठवावेत असे आवाहन वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी केले आहे .
वाई तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने तालुक्यातील गावांच्या नळ पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरु होत्या, पण या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची टंचाईही वाढू लागली आहे.
तालुक्यातील पठारावरील गुंडेवाडी, बालेघर अंतर्गत अनपटवाडी या गावांनी टॅंकर मागणी केली आहे, त्याचे प्रस्ताव वाई पंचायत समितीकडे दिले आहेत. यापैकी गुंडेवाडी गावाला पाण्याचा टॅंकर सुरू करण्यात आला आहे.
मांढरदेव गावालाही पाणीटंचाई भासत आहे, मात्र त्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावातील एक विंधनविहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. तालुक्यातील गावांना जलद गतीने पाणी पुरवठा करता यावा यासाठी रविवार पेठ येथील केशवराव पाडळे यांची विहीर अधिग्रहण करण्यात आली आहे.
तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाई पंचायत समिती सज्ज झाली असल्याची माहिती वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.