विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
केल्याने होते रे, आधी केलेची पाहिजे या उक्तीला परिश्रमाची जोड देत, जोखीम पत्करत बारामती तालुक्यातील निंबुत येथील शेतकरी संभाजीराव काकडे यांनी आपल्या शेतात आल्याचे यशस्वी उत्पादन करत लाखोंची कमाई केली आहे. पहिले वर्ष तोट्यात गेले. पहिल्या वर्षी त्यांना टनाला १० हजाराचा भाव मिळाला.
त्यामुळे त्यांना पहिल्या वर्षी तोटा सहन करावा लागला. मात्र तरीदेखील त्यांनी हार न मानता जिद्द, चिकाटी आणि कष्ट या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश हमखास मिळू शकते. हे यावर्षी आल्याच्या शेतीतून दाखवून दिले आहे.यावर्षी त्यांना आल्याला प्रतिटन ६६ हजाराचा भाव मिळाला. त्यांना चांगले उत्पादनही मिळाले आहे.
संभाजीराव काकडे हे सोमेश्वर विद्यालयात नोकरीला होते. २०२१ मध्ये नोकरीतून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष द्यायला सुरवात केली. आपल्या शेतातील पावणे दोन एकर शेतात त्यांनी आल्याची लागवड केली. विशेष म्हणजे पपईच्या बागेत अंतर पीक म्हणून त्यांनी हे आल्याचे पीक घेतले होते. यावर्षी मात्र त्यांना आल्याला मिळणाऱ्या बाजारभावाने चांगली साथ दिली. त्यांना पावणे दोन एकरात ६ लाख १२ हजार खर्च आला. त्यांना १७ लाख ८२ हजाराचे उत्पादन मिळाले. उत्पादन खर्च वजा जाता संभाजीराव काकडे या शेतकऱ्याला अकरा लाख सत्तर हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे.
आले हे पीक सातारा, कोरेगाव, सांगली या भागात घेतले जाते. पुणे जिल्ह्यात पुरंदर,बारामती तालुक्यात आल्याचे पीक फारसे घेतले जात नाही. परंतु काकडे यांनी प्रयोग म्हणून हे पीक घेतले. उसाच्या मागे धावण्यापेक्षा आल्याचे उत्पादन घेतल्याने यश मिळाल्याचं संभाजीराव काकडे यांनी सांगितलं.
मागील वर्षी एकरी तीन लाख रुपये तोटा झाला होता. एकदा झालेल्या तोट्याने खचून न जाता पीक लागवडीत सातत्य ठेवल्यास फायदा झाला. आपल्या मातीत हे पीक व्यवस्थित येईल का नाही. या बाबत शंका होती. मात्र यावेळी चांगले पीक आले.त्याचबरोबर बाजारही चांगला मिळाला. यातून मागील तोटाही भरून काढता आला. सेंद्रिय खतांचा जास्त वापर केला.
रासायनिक खतांचा वापर कमी केला.आता पुढील वर्षी आल्याचे उत्पादन शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने घेणार आहे.शेतमालाला सरकारने जर हमी भाव दिला तर अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे लक्ष देतील आणि रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल. असे संभाजी काकडे यांनी सांगितले आहे. शेतीकडे पाठ फिरविणाऱ्या तरुणांची संख्या अधिक दिसते. त्याला संभाजीराव काकडे या शेतकऱ्याने चिकाटीतून शेती कशी किफायतशीर ठरू शकते हेही दाखवून दिले आहे.