सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : अवकाळी पावसाने इंदापूर तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत शेती, फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनी तहसीलदार यांना दिल्या आहेत.
दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला असून अद्यापही पावसाचे वातावरण आहे. आमदार भरणे म्हणाले की,मागील दोन-चार वर्षांपासून वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.त्यातच अवकाळी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभा राहिले आहे.
ऊस, डाळिंब, केळी, पेरु, द्राक्षे यासारख्या फळबागांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतमालाची कवडीमोल दराने विक्री होत असल्याने आधीच शेतकऱ्यांना खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यातच अवकाळी पावसाने शेतकरी अजून अडचणीत आले आहे. त्यामुळे शासनाकडून तात्काळ मदत मिळणे अत्यावश्यक असल्याने तहसिलदार यांनी ताबडतोब नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत अशा सूचना दिल्या असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले..