बारामती: महान्यूज लाईव्ह
महावितरणने १ एप्रिल २०२३ पासून जवळपास ३३ टक्के इतकी प्रचंड वीज दरवाढ लागू केलेली आहे. मुळातच महाराष्ट्राचे वीजदर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असून पुन्हा दरवाढ लादल्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग प्रचंड आर्थिक अडचणीत येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनाने वीजदरवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातील उद्योजक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी महावितरणला दिला.
महावितरणने दरवाढ त्वरित रद्द करावी या मागणीचे निवेदन बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांना बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने ऊर्जा भवन येथे निवेदन देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव अनंत अवचट, सदस्य मनोज पोतेकर, अंबीरशाह शेख, महादेव गायकवाड, हरीश कुंभरकर, मनोहर गावडे, पंढरीनाथ कांबळे, संदीप जगताप, पंडित रणदिवे, शिवाजी साळुंके, हेमंत हेंद्रे, दादासाहेब चौधर, पणदरे एमआयडीसीतील उद्योजक संजय पवार, संतोष वाघ, विजय कदम, शेखर जगताप, यशवंत गायकवाड, शिवाजी शिर्के, आदी उद्योजक यावेळी उपस्थित होते.
जामदार म्हणाले, राज्याराज्यात उद्योगांमधील तीव्र स्पर्धा असताना महाराष्ट्रातील वीजदर कळीचा मुद्दा ठरत आहे. अशातच पुन्हा वीज दरवाढ केल्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायिक स्पर्धेतून बाहेर फेकले जातील याची चिंता वाटत आहे. आत्ताच बारामती सह राज्यातील अनेक मोठे प्रकल्प अवाजवी वीज दरामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कित्येक लहान मोठे उद्योग परराज्यात स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत.
औद्योगिक क्षेत्रात आजही आपले महाराष्ट्र राज्य देशात अव्यल स्थानावर असून राज्या शासनाने हे स्थान टिकवून ठेवण्याचे धोरण ठेवले पाहीजे, परंतु दुर्दैवाने या उलट होताना दिसत आहे.
महावितरणने वीज गळती, वीजचोरी बरोबरच भ्रष्टाचारास आळा घालत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रभावी व्यवस्थापन करून काटकसरीचे धोरण राबवणे अत्यावश्यक आहे. वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे, खाजगी वीज प्रकल्पातून कमीत कमी दराने वीज खरेदी करणे तसेच सौर ऊर्जा व पवन ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या बाबी अंमलात आणल्या, तर मोठी आर्थिक बचत होऊ शकते व वीज दरवाढ करण्याची वेळ येणार नाही असे आमचे मत आहे.
वीज दरवाढीविरोधात उद्योजकांच्या भावना तीव्र असून याबाबतचे निवेदन राज्य सरकार व महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सत्वर पाठवण्यात येईल असे आश्वासन महावितरण बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले.