सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापुर तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शैला सोमनाथ जावळे यांच्या विरोधात सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठराव ८ विरूद्ध १ अशा मतांनी संमत झाला.काल (दि.१४) सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली.
सरपंच शैला जावळे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारी यावेळी दिसून आल्या. सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, गावची विकासाची कामे करत नाहीत, ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणेस टाळाटाळ करीत करतात, आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत आहेत, सरपंच मनमानी कारभार करत आहेत, सहकारी सदस्यांना अपमानकारक वागणूक देतात, सरपंच यांचे पती सोमनाथ जावळे कामकाजामध्ये हस्तक्षेप करतात अशी कारणे देत अविश्वास प्रस्ताव मांडला होता.
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बाभुळगाव ग्रामपंचायतीच्या जानेवारी 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या गटाने राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांना धूळ चारत सत्ता हस्तगत करत शैला जावळे यांना सरपंच केले. मात्र गेल्या वर्षी सरपंचांनी राष्ट्रवादीची वाट धरली. ही बाब सदस्यांना रुचली नाही. अशातच आमदार दत्तात्रय भरणे यांनीही आर्थिक ताकद देण्याचा प्रयत्न केला. मग राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील कामांबाबतची नाराजी चव्हाट्यावरही आली.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाव भेट दौऱ्यात एका राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांने आमदार दत्तात्रय भरणे हे निधी देतात, मग त्या योजना पूर्ण का नाहीत ? त्या योजनेचा निधी जातोय कुठे ? अशी खंत व्यक्त करत कार्यकर्त्यांची खदखद बोलून दाखवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या कारभाराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे गाव चर्चेत राहिले.
अशावेळी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी सरपंचांवर एकत्रित येऊन अविश्वास ठराव मंजूर केल्याने भाजपाच्या गोटात आनंद तर राष्ट्रवादीच्या गोटात शांतता पसरली आहे. आठ विरुद्ध एक असे मतदान म्हणजे राष्ट्रवादीला सर्व सदस्यांनी ठोकरले आहे.
जानेवारी २०२१ च्या सार्वत्रिक निवडणूकीत सरपंच शैला जावळे या निवडून आल्या होत्या. हनुमान ग्रामविकास पॅनल या भाजप्रणीत पॅनल कडून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी अनिल दशरथ चव्हाण, छाया तानाजी यादव, शैला सोमनाथ जावळे, दिनेश लक्ष्मण वायकर, नागनाथ भिवा गुरगुडे, संगिता राजाराम इंगळे, दादासाहेब साहेबराव भोसले, शितल मधुकर खिलारे, रेश्मा सुखदेव गुरगुडे हे नऊ सदस्य म्हणून बाभुळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाले होते.
त्यावेळी सरपंच पद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने शैला जावळे या सरपंच झाल्या.त्यानंतर वर्षभरापूर्वी सरपंच शैला जावळे व सोमनाथ जावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधली. राष्ट्रवादीकडे सरपंच गेल्याने भाजप गटाच्या सदस्यांमध्ये नाराजी पसरली होती. सरपंचांना सदस्यांचा विश्वास जिंकणे शेवटपर्यंत जमले नाही. सदस्यांनी राष्ट्रवादीच्या सत्तेला कसलेच स्वीकारले नाही. सरपंचावर अविश्वास आणून राष्ट्रवादीला एक प्रकारे चपराक दिली आहे.
दरम्यान आज बाभूळगावमध्ये यावेळी पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनवे यांच्यासह तीन पोलिस अधिकारी यासह मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य दादासो भोसले म्हणाले की, सरपंच सौ. जावळे या भाजपच्या गटाच्या पॅनल कडून निवडून येऊन विरोधी पक्षाच्या गटात गेल्या. त्यांनी मतदारांचा विश्वासघात केला आहे. त्याबरोबर मनमानी कारभार, ग्रामपंचायतीच्या कारभारात पती सोमनाथ जावळे यांचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढतच होता. म्हणून आम्ही सर्व सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. आणि तो आम्ही बहुमताने मंजूरही केला.
भाजपाचे युवा नेते अमोल इंगळे म्हणाले, बाभुळगावची ग्रामपंचायतीची सत्ता भाजपने मिळवली होती. सरपंच जावळे यांच्यावर मनमानी कारभाराचे आरोप झाले. काही दिवसात आम्ही सरपंच पदावर भाजपच्या विचारांचा सरपंच देत आहोत. इथून पुढे होणारी कामे पारदर्शक आणि दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत
गावचे नेते व सरपंच शैला जावळे यांचे पती सोमनाथ जावळे म्हणाले, बाभुळगाव ग्रामपंचायतीत आज सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला हे सत्य आहे. सरपंच शैला जावळे यांनी गावच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले. चांगली कामे करण्याचा प्रयत्नही केला, परंतु सहकारी सदस्यांना हे पटले नाही त्यामुळे अविश्वासाचा ठराव केला. हा ठराव आम्ही मोठ्या मनाने स्विकारला आहे. जावळे यांनी होणाऱ्या नवनियुक्त सरपंचांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.