दौंड – महान्यूज लाईव्ह
दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर पाचशे कोटींच्या कथित आरोपानंतर दौंड शहरात आमदार कुल समर्थकांनी निषेध मोर्चा काढण्याचे नियोजन केले असून यामध्ये दौंडच्या बहुजन समाज पक्षाने उडी घेतली आहे. भ्रष्टाचारी नेत्यांच्या समर्थनार्थ निषेध आणि मोर्चा काढण्यापेक्षा दौंड शहरातील प्रलंबित विकासावर बोला असे आव्हान दिले आहे.
खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांच्यावर पाचशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्यानंतर दौंड तालुक्यात आमदार कुल समर्थकांनी संजय राऊत यांचा ठिकठिकाणी निषेध नोंदवला. त्यानंतर आता दौंड शहरातील आमदार कुल समर्थकांनी आमदांराचा अपमान केला आहे म्हणून शहरात निषेध मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे.
यावर बहुजन समाजाने खिल्ली उडविली आहे. बहुजन समाज पक्षाचे नेते उमाकांत कांबळे यांनी एका भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांवर पांघरूण घालण्याचा हा प्रकार आहे, त्यापेक्षा त्यांनी शहराचा विकास करावा, सध्या दौंड शहरातील मार्केट मेलेल्या अवस्थेंत झालेले आहे. व्यापारपेठ अडचणींचा सामना करीत असून त्यांच्याकडे लक्ष द्यावे.
शहरात चांगल्या दर्जाचे उच्च शिक्षण नाही. मोठे मोठे उद्योग व व्यवसाय नाही. त्यासाठी प्रयत्न करा. सत्ता असुन ते का हे सर्व करत नाहीत? सत्तेतून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून सत्ता हेच सत्ताधाऱ्यांनी साध्य केले आहे. आमदार कुल समर्थकांनी निषेध मोर्चा काढुन शहरातील नागरिकांना वेठीस धरू नये, अन्यथा बहुजन समाज पार्टी देखील याविरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.