राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पूर्व भागात महावितरण वीज कंपनीच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करीत मलठण वाटलुज, नायगाव, भागातील शेतकऱ्यांनी मलठण येथील महावितरणच्या उपकेंद्र कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले. दरम्यान, महावितरण वीज कंपनीचे अधिकारी व शेतकरी आमने-सामने आल्याने बराच वेळ याठिकाणी तणाव निर्माण झाल्याचे चित्र होते.
दौंड तालुक्यातील वाटलुज, नायगाव या भीमा नदीलगतच्या गावांना वीज पुरवठा करणाऱ्या मसोबा फाटा येथील ११ केव्ही विद्युत लाईनच्या विलगीकरण कामात मागील अनेक दिवसांपासून दिरंगाई होत आहे. हे काम तातडीने मार्गी लावावे या संदर्भात या भागातील शेतकरी वारंवार महावितरण वीज कंपनीच्या कार्याकडे पत्र्यावर करीत आहेत.
मात्र या कामात हलगर्जीपणाही होत असल्याने मलठण, वाटलूज, नायगाव या भागातील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि २३) मलठण येथील महावितरणच्या सब स्टेशन कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. महावितरण वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीचे समाधान न झाल्याने शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या ठिय्या आंदोलनांचे रूपांतर अर्धनग्न आंदोलनात झाले.
शेतकऱ्यांनी आपले कपडे काढत अर्धलग्न अवस्थेत आंदोलन सुरू केल्याने महावितरण अधिकाऱ्यांची धांदल उडाली, बराच वेळ याठिकाणी तणावग्रस्त वातावरण झाल्याचे चित्र होते. तालुक्यातील मलठण सब स्टेशन अंतर्गत वाटलुज, नायगाव, म्हसोबा फाटा परिसरात ११ केव्ही विद्युत लाईनच्या विलगीकरण कामात प्रचंड दिरंगाई होत असल्याने या भागातील पिके पाणी असूनही जळून जात आहेत.
महावितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात याबाबत अनेकवेळा अर्ज, विनंत्या व निवेदने देऊनही मागील २ वर्षांपासून हे काम बंद पडले आहे. परिणामी भीमानदी पात्रालगतच्या गावात मुबलक पाणीसाठा आहे मात्र म्हसोबा फाटा येथील ११ केव्ही विद्युत लाईनच्या विलगीकरण वेळेत होत नसल्याने या भागात दिवसाआड चार तास लाईट आणि तिही अतिशय कमी दाबाने मिळत आहे.
नियमित शेती व घरगुती वीजबिले भरूनही महावितरण कंपनीकडून हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. वीज नसल्याने शेतकऱ्यांची उसासारखी उभी शेतीचे जळु लागली आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. महावितरण विजकंपनीने पुढील आठ दिवसांत याबाबत तोडगा न काढल्यास व मसोबा फाटा येथील ११ केव्ही
विद्युत लाईनच्या विलगीकरण न केल्यास भीमा नदी पात्रात अर्धनग्न जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा या भागातील शेतकऱ्यांनी महावितरण विज कंपनीला निवेदनाद्वारे दिला आहे.