राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील मातंग समाजाचा मुलगा व मराठा समाजाची मुलगी प्रेमप्रकरणातून पळून गेले.. म्हणून चिडलेल्या मराठा समाजातील ७ जणांसह अनोळखी १० ते १५ जणांनी मुलाच्या आईस मारहाण केली या कारणावरून यवत पोलिसांनी २२ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसानी या प्रकरणी सोपान बेलुसे, बाबु बेलुसे, समीर हरपुडे बाळा हाळंदे, श्रीकांत पोळेकर, समीर हारपुडे याची आई, बाबु बेलुसे याची आई व इतर १० ते १५ जणांविरोधात (सर्व रा. पाटस, ता. दौंड) पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १६ फेब्रुवारी दरम्यान समीर हरपुडे याने पिडीत महिलेच्या मोबाईलवर फोन करून तुझ्या मुलाने बहिणीस पळवून नेले आहे अशी माहिती दिली. त्यावर पिडीत महिलेने त्या दोघांचे तुकडे कर असे सांगितले. त्यानंतर समीरच्या पत्नीनेही मावशी तुम्ही घरी या, मुले कुठे आहेत माहिती आहे का? अशी माहिती विचारली. मात्र पिडीत महिलेने आपण आजारी असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित पिडीत महिला ही शेतात काम करण्यास गेली.
त्यानंतर शेजारील महिलेने तिच्या मोबाईलवर फोन करून या महिलेच्या लहान मुलास लोक मारहाण करीत असल्याचे सांगितले. त्यावरून घाईगडबडीने ही महिला घरी परतली असता १० ते १५ जणांनी हे लोक लय माजलेत म्हणत साडी ओढून, ब्लाऊज फाडून हिला खांबावर बांधा, हिला येथे राहू देऊ नका, तिचे घर जाळून टाका असे म्हणून मारहाण केली अशा आशयाची फिर्याद या पिडीत महिलेने दिली.