राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र सरकारच्या वतीने यंदा दिला जाणारा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार नुकताच कोकणातील आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सरकारने जाहीर केला आहे. मात्र हा पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडला असून संभाजी ब्रिगेडने धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यास विरोध केला आहे.
सरकारने हा पुरस्कार दिला तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सोलापूर संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी दिला आहे. तर सरकार ने महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा फक्त आर एस एस च्या कार्यकर्त्यांसाठी राखीव ठेवला आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने जे निवेदन दिले आहे, त्यामध्ये नमूद केल्यानुसार सन १९९६ पासून महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला जातो. परंतु या पुरस्काराच्या विजेत्यांचे बारकाईने निरीक्षण आणि परीक्षण केले असता यातील बहुतांश विजेते हे एकाच विशिष्ट समाजाचे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते अर्थात हे ठरवून केले जाते.
सरकारने जातीवादी मानसिकतेतून ब्राह्मणी व्यवस्थेचे लांगुलचालन करण्यासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. याला सर्वच सरकारे जबाबदार आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आप्पासाहेब धर्माधिकारींना दिलेल्या पुरस्काराचा जाहीर निषेध करत आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कोणतेही फार मोठे सामाजिक कार्य नाही. महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेला त्यांचे नाव सुद्धा ठाऊक नाही. ते कोकण परिसरात रामदासी बैठका भरवून लोकांच्या डोक्यामध्ये जातीयता, खोटा इतिहास आणि अंधश्रद्धा व धार्मीक गुलामगिरी पसरवण्याचे काम करतात.
नाना धर्माधिकारी व त्यांचा मुलगा अप्पासाहेब धर्माधिकारी हे रामदासी बैठकांच्या माध्यमातून समाजामध्ये जातवादाचे, विषमतेचे विष कालवण्याचे काम करत आहेत. या बैठकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवली जाते. बैठकीत येणाऱ्या बहुजन समाजातील लोकांना मानसिक गुलाम बनवले जाते.
यातून स्त्रिया व मुले या षडयंत्राला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. समाजसेवेच्या नावाखाली रामदासी वर्णव्यवस्था व मनुवादी विषमता बहुजनांच्या डोक्यात लादण्याचे हे कारस्थान आहे. असंख्य बहुजन कुटुंब यामुळे बरबाद झाली असून, शिक्षण -रोजगार सोडून अंधश्रद्धेच्या मार्गी लागलेली आहेत.
रामदासी बैठकांच्या नावावर अनेक ठिकाणी खूप वाईट प्रकार सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे कोणत्याही प्रकारे गुरु शिष्याचे नाते नव्हते हे उच्च न्यायालयाने सुद्धा सिद्ध केलेले आहे. तरीसुद्धा पुन्हा पुन्हा रामदास स्वामींचे उदातीकरण करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी रामदासी बैठका घेत असतात.
प्रत्येक घरामध्ये दासबोधाचे व रामदासी देव्हारे, रामदासी पट्ट्या यांचे वाटप केले जाते .यातून खूप मोठा आर्थिक व्यवहार होतो .रात्रंदिवस मुलांना महिलांना व कुटुंबातील व्यक्तींना दासबोधाच्या पारायणामध्ये गुंतवून ठेवले जाते. त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास खुंटतो. अशा व्यक्तीला खरं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या खाली अटक व्हायला हवी, परंतु सरकार त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे.
शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही हे होऊ देणार नाही. सर्व बहुजनवादी संघटनांनी व कार्यकर्त्यांनी या विरोधात आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. सरकारने तत्काळ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करण्यात यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड राज्यभर आंदोलन छेडेल आणि त्याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातुन होईल.हा सरकारला इशारा दिला आहे.
दरम्यान, याबाबत संभाजी ब्रिगेड ने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुर्डूवाडीचे उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी ज्योती कदम यांना नुकतेच दिले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिनेश जगदाळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, माजी जिल्हा सचिव सुहास टोणपे, माळशिरस तालुका उपाध्यक्ष सचिन पराडे, गटप्रमुख अभयसिंह पाटील,किरण जाधव,श्रीकांत पाटील, गुलाब पाटील, विजय काळे, दत्तात्रय चव्हाण आदींसह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.