दौंड,महान्युज लाईव्ह
मुंबई ते सोलापूरला शुक्रवार पासून धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दौंड रेल्वे जंक्शन थांबा देण्यात केंद्रीय रेल्वे प्रशासनाला विसर पडला आहे. मात्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड जंक्शन हे किती जुने आणि किती महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे याची आठवण करून देत वंदे भारत एक्स्प्रेस ला थांबा द्यावा अशी मागणी केंद्र सरकार व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून सोलापूर येथे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवारी (दि.१०) पासून सुरु होत आहे. ही गाडी दौंड मार्गेच सोलापूरकडे रवाना होणार आहे. तथापि तिला दौंड रेल्वेस्थानक थांबा देण्यात आलेला नाही. उद्या गाडीचा पहिलाच दिवस असल्याने उद्या मात्र ही गाडी दौंडला थांबणार आहे.
त्यानंतर मात्र दौंड स्थानक कायमस्वरुपी वगळण्यात आले आहे. ही बाब लक्षात येताच खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने ट्विट करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना रेल्वेच्या बाबतीत दौंडचे महत्व लक्षात आणून दिले आहे.
दौंड हे रेल्वेच्या सोलापूर मार्गावरील अतिशय महत्त्वाचे जंक्शन आहे.
इतकेच नाही, तर दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारे सर्वात मोठे रेल्वेस्थानक दौंड येथे आहे. हजारो प्रवासी या मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे या परिसरातील नागरीकांच्या सोयीसाठी या ट्रेनला या स्थानकावर थांबा देण्याची अत्यंत गरजेचे आहे. तरी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ला दौंड येथे थांबा देण्याबाबत आवश्यक ते सोपस्कार पार पाडावेत, असे सांगत ते आपल्या मागणीचा नक्कीच सकारात्मक विचार करतील, असे सुळे यांनी म्हटले आहे.