मुंबई -महान्यूज लाईव्ह
फक्त कोकण जिंकल्यानंतरही भाजपची घौडदौड वृत्तवाहिन्यांतून दाखविण्याचा सपाटा सुपारीबाज संपादकांनी दाखवला, मात्र जुन्या पेन्शनच्या रागापेक्षाही महाराष्ट्रातील सध्याचे घाणेरडे राजकारण राज्यातील सुशिक्षितांनी त्यांच्या मतातून दाखवून दिले. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीतून दिसून आले.
भाजपचा नागपूरच्या घरच्या मैदानावर झालेला पराभव, अमरावती या परंपरागत मतदारसंघात झालेली पिछेहाट आण औरंगाबादमध्ये नकारात्मक स्थितीचा सत्ताधाऱ्यांना न घेता आलेला फायदा या गोष्टी नीट अभ्यासल्या, तर राज्यातील घाणेरड्या राजकारणाचा उबग आलेल्यांची ही प्रतिक्रिया मानली जात आहे.
नाशिक मतदारसंघात अपक्ष सत्यजित तांबे निवडून आले, मात्र ती जागाही भाजपची नाही. भाजपने शेकापला धक्का देत कोकणात मविआची ताकद क्षीण करून टाकली. मात्र ते कौशल्य नागपूरमध्ये त्यांना का जमले नाही? नागपूरमध्ये शिक्षक परीषदेने ही जागा लढवली, ती भाजपने लढवली असती, तर चित्र वेगळे दिसले असते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालानंतर व्यक्त केली आहे, मात्र याचा अर्थ शिक्षक परीषदेने ही जागा लढवल्यामुळे भाजप पूर्ण तयारीने यात उतरला नव्हता का? असा प्रश्न त्यातून तयार होतो.
काहीही असले, तरी शिक्षक व पदवीधर निवडणूकीत सत्तेत असलेल्या भाजप-शिंदे गटाला मतदारांनी जोराचा झटका दिला आहे. नाशिकमध्ये तांबे निवडून आले असले, तरी भाजपला येथे आपला शिक्का उमटवता येणार नाही, कदाचित ते तांबेना भाजपमध्ये येण्याचाच आग्रह धरू शकतात. मात्र तरीदेखील ही जागा सत्ताधारी भाजप-शिंदे गटाची नाही हेही तेवढेच खरे.
गेल्या काही महिन्यांत महाविकास आघाडीला एकीने राहण्याची झालेली जाणीव, या निवडणूकीत एकीने लढल्याचा परिणाम आणि एकूणच महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांविरोधातील जनमत याची लिटमस चाचणी या निवडणूकीने झाली आहे. औरंगाबाद मतदारसंघात विक्रम काळे यांच्याविषयी काहीशी नाराजी होती, मात्र महाविकास आघाडी एकजूटीने लढल्याचा परिणाम त्यातून दिसून आला आणि काळेंनी चौथ्यांदा रिंगण मारले.
अमरावतीत सुरवातीला असलेली आघाडी मविआच्या उमेदवाराने कायम राखली. मग भाजपच्या उमेदवाराने अवैध मतांची फेरमोजणी करण्याचा आग्रह धरला. मग अवैध मतांचीही मोजणी झाली, त्यातही मविआचाच उमेदवार आघाडीवर राहीला. मग भाजपच्या उमेदवाराने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्याचा आग्रह धरला. मग दुसऱ्या पसंतीचीही मते मविआलाच आघाडी दाखवून गेली.
एकूणच काही दिवसांपूर्वी सी व्होटरने राज्यातील परिस्थितीचा निवडणूक पूर्व सर्वे केला होता, त्याचे काहीसे पडसाद प्रत्यक्षात निवडणूकीत दिसून आले आहेत. राज्यातील शिंदे गटाने पाडलेली फूट लोकांच्या अद्यापही पचनी पडलेली नाही आणि सबसे अलग म्हणणाऱ्या भाजपचे राजकारणही..!