दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
आंबोली घाट नेहमीच गुन्हेगारासाठी आश्रयस्थान बनत चालला असून याचाच प्रत्यय आज (मंगळवारी) आला. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून झालेल्या भांडणात एकाचा खून झाला. खूनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघेजण आंबोलीत आले. मृतदेह दरीत टाकताना पाय घसरल्यामुळे त्यातील एकाचा मृत्यू झाला.
ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजता घडली. मात्र मंगळवारी दुपारी अडीच वाजता ११२ नंबरवर नातेवाईकांकडून माहिती देण्यात आल्यामुळे सर्व प्रकार उघड झाला. मात्र या घातपातामागे नेमके कारण काय, हे मात्र अद्याप पोलिसांच्या तपासात उघड झाले नाही.
पोलिसांनी खोल दरीत असलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ते सावंतवाडी रुग्णालयाकडे आणले. याप्रकरणात दोघांसोबत असलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
येथे सुरू असलेल्या चर्चेनुसार वीटभट्टी व्यवसायात पैसे घेतल्यानंतर पैसे परत करत नसल्याने वाद झाला व या वादातून मारहाण करण्यात आल्यानंतर या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आणि तो पुरावा नष्ट करण्यासाठी आंबोलीत मृतदेह टाकण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरला अशी चर्चा आहे.