अदानी ग्रुपच्या कथित फ्रॉडवरून हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिध्द झाला आणि अदानी ग्रुपच्या शेअर बाजारातील घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या समूहाचे तब्बल ४ लाख ३० हजार कोटींहून अधिक रकमेचे नुकसान झाले. मात्र आता अदानी ग्रुपने यावर स्पष्टीकरण देत ज्यावेळी नेमका देशातील इक्विटी शेअर्सचा सर्वात मोठा एफपीओ अदानी ग्रुप घेऊन येत असतानाच कसा हा अहवाल प्रसिध्द केला असा सवाल करीत ४१३ पानी स्पष्टीकरण दिले आहे.
हा देशावरचा हल्ला, देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा हल्ला असे नामकरणही अदानी ग्रुपने केले आहे. खोटी कहाणी पसरवण्यासाठी आधीपासूनच पब्लीक डोमेनमधील प्रकरणांचे सिलेक्टिव्ह व मॅनिपुलेटिव्ह सादरीकरण केल्याचा आरोप हिंडेनबर्गवर केला असून कायदेशीर व औद्योगिक प्रॅक्टिसचे पूर्ण अज्ञान अथवा जाणीवपूर्वक अवहेलना करण्याचा हेतू यामागे असल्याचे अदानी ग्रुपचे म्हणणे आहे.
हा केवळ विशिष्ठ कंपनीवर करण्यात आलेला हल्ला नसून भारत आणि भारतातील संस्थांनांचे स्वातंत्र्य, अखंडता, विकासाची संकल्पना व अर्थव्यवस्थेवर केलेला हल्ला असल्याचे अदानी ग्रुपने म्हटले आहे.
हिंडेनबर्गसारख्या अविश्वसनीय संस्थेने केलेल्या या कृतीमुळे आमचे अफाट नुकसान झाले असून गुंतवणूकदारांच्या आमच्यावरील विश्वासाला तडा गेल्याने आम्ही अत्यंत चिंतेत आहोत असे या ग्रुपने म्हटले आहे.
दुसरीकडे शेअर ढासळल्याने एलआयसीचे १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र एलआयसीचे म्हणणे आहे की, आम्ही अजूनही केलेल्या गुंतवणूकीच्या तीनपट नफ्यात आहोत, त्यामुळे आम्ही आमचे शेअर आताच विकणार नाही. तर अदानी मध्ये गुंतवणूक केलेली आणखी एक गुंतवणूकदार संस्था म्हणजे स्टेट बॅंकेने देखील काळजी करण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.